सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : भारतीय डाक विभागामार्फत या वर्षी “ढाई आखर” या राष्ट्रीय स्तरावरील पत्रलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. स्पर्धेचा विषय “डिजिटल युगात पत्रांचे महत्व” असे असून मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील पत्र स्वीकारले जाणार आहे. हि स्पर्धा खुली असून १८ वर्षापर्यंत व १८ वर्षावरील अशा दोन गटात होइल. १४ डिसेंबर २०२४ पर्यंत लिहिलेली पत्रे स्पर्धकांनी लिफाफ्यावर किंवा आंतर्देशीय पत्रावर आपले नाव व संपूर्ण पत्ता लिहून तसेच लिफाफा, आंतर्देशीय पत्रावर वरील बाजूस ” ढाई आखर ” राष्ट्रीय स्तरावरील पत्रलेखन स्पर्धा असे नमूद करून चीफ पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई ४००००१ या पत्त्यावर पाठवावित, असे आवाहन जिल्हा डाकघर अधीक्षक मयुरेश कोले यांनी केले आहे. पत्रलेखनाकरिता शब्द मर्यादा पोस्ट लिफाफा, साध्या लिफाफ्यामधून (आवश्यक तिकीट लावून) ए – 4 साईज पेपरवर जास्तीत जास्त १००० शब्द व आंतर्देशीय पत्रावर जास्तीत जास्त ५०० शब्द आहे. महाराष्ट्र मंडळ स्तरावरील निवडक पहिल्या ३ पत्रांना गटा प्रमाणे प्रथम क्रमांक २५ हजार रुपये, व्दितीय क्रमांक १० हजार रुपये, तृतीय क्रमांक ५ हजार रुपये अशी पारितोषिके दिली जाणार आहेत. मंडळ स्तरावरील तीन बक्षिसपात्र पत्रे राष्ट्रीय स्तरावर पाठविली जाणार असून तेथे पुन्हा क्रमांक काढण्यात येवून पहिल्या तीन क्रमाकांच्या पत्रांना अनुक्रमे ५० हजार रुपये, २५ हजार रुपये व १० हजार रुपये अशी पारितोषिक दिली जाणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी, नागरिकांनी यास्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहन सिंधुदुर्ग विभागाचे डाकघर अधीक्षक मयुरेश कोले यांनी केले आहे.