भाजपा जिल्हा सरचिटणीस जयदेव कदम यांचे निधन

देवगड (प्रतिनिधी} : भाजपा जिल्हा सरचिटणीस व इळये गावचे सरपंच जयदेव भास्कर कदम (51) यांचे मंगळवारी सायंकाळी 4 वा.सुमारास शिरगाव येथे अल्पशा आजाराने निधन झाले.

शिरगाव येथे निमतवाडी येथे मेव्हण्याचा घरी कार्यक्रमानिमित्त सोमवारी ते गेले होते. मंगळवारी सायंकाळी 4 वा.सुमारास त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने शिरगाव येथे डॉ.राजेंद्र चव्हाण यांच्या  रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापुर्वीच त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगीतले.गेली काही वर्षे ते किडनीच्या आजाराने त्रस्त होते. भाजपा संघाच्या विचारांचे बाळकडून त्यांना लहानपणापासून घरातूनच मिळाले होते. कॉलेज जीवनात भाजपाप्रणित अभाविप संघटनेचे ते काम करीत होते..या संघटनेच्या माध्यमातूनच त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरूवात केली.त्यानंतर भाजपा पक्षाच्या विविध प्रमुख पदावर त्यांनी काम केले.भाजपा तालुका सरचिटणीस, भाजपा तालुकाध्यक्ष, भाजपा जिल्हा सरचिटणीस, देवगड तालुका खरेदी विक्री संघ चेअरमन, संजय गांधी निराधार याेजना समितीचे अध्यक्ष, इळये गाव तंटामुक्त समिती अध्यक्ष अशा विविध पदांवर त्यांनी काम पाहिले.तळवडे पं.स.निवडणुकही ते लढले मात्र त्या निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यानंतर इळये ग्रामपंचायत निवडणुकीत ते विजयी झाले व इळये गावचे सरपंच झाले.सरपंचपदावर त्यांनी चांगले काम केले मात्र प्रकृती अस्वस्थामुळे त्यांनी सरपंचपदाचा राजीनामा दिला.

भाजपा पक्ष संघटना वाढविण्यासाठी त्यांचे मोठे योगदान होते. गेली दोन तीन वर्षे किडनीच्या आजाराने त्रस्त होते.तळागाळातील कार्यकर्त्यांशी सतत संपर्क ठेवणारे नेतृत्व होते.राजकारणाबरोबरच त्यांनी समाजकारणाला झोकून दिले होते.सामाजिक कार्यालाही त्यांनी वाहून घेतले होते.त्यांचा पश्चात पत्नी, मुलगा, मुली असा परिवार आहे. त्यांचा निधनाची बातमी समजताच आमदार नितेश राणे, माजी आमदार अ‍ॅड.अजित गोगटे, भाजपा तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर आदी भाजपा नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी त्यांचा पार्थिवाचे दर्शन घेतले. बुधवारी सकाळी इळये या गावी सकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

error: Content is protected !!