तात्काळ पोलीस कर्मचारी नेमा, पोलिस निरीक्षकांकडे मागणी…
सावंतवाडी (प्रतिनिधी) : वेंगुर्ला-बेळगाव रस्त्यावरून मद्यधुंद अवस्थेत चिरे आणि वाळू वाहतूक करणाऱ्या बेदरकार ट्रक व डंपर चालकांना आवरा त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी कोलगाव सरपंच संतोष राऊळ यांनी सावंतवाडी पोलिस निरिक्षकांकडे केली आहे. शनिवारी कोलगाव येथे झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातले तिघे व्यक्ती गंभीर जखमी झाले होते. त्यात एका मुलीचा समावेश होता.
या पार्श्वभूमीवर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
त्यांच्या म्हणण्यानुसार, त्या ठिकाणावरून जाणारे ट्रक व वाळूच्या वाहतूक करणारे ट्रक व डंपर भरधाव वेगाने हाकले जातात. त्यात असलेल्या चालक हे बऱ्याच वेळा मद्यधुंद अवस्थेत किंवा अंमली पदार्थाच्या नशेत असतात. त्यामुळे अनेकांना अपघाताला सामोरे जावे लागते. आंबोली घाटात सुद्धा अशाच प्रकारे एका आयशर ट्रकने धडक दिल्यामुळे एका चिमुकलीला जीव गमवावा लागला होता. ही घटना ताजी असताना काल झालेला अपघात हा अंगावर काटा आणणार आहे. हे सर्व लक्षात घेऊन त्या ठिकाणी तात्काळ पोलीस कर्मचारी नेमण्यात यावे तसेच त्या ठिकाणाहून भरधाव जाणाऱ्या ट्रक चालकांना दंडात्मक कारवाई करण्यात येईल, अशी मागणी श्री. राऊळ यांनी केली आहे.










