देवगड (प्रतिनिधी) : बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली संलग्न कृषी महाविद्यालय सांगुळवाडी येथील कृषिदूतांनी ‘ग्रामीण जागृती कार्यक्रम कार्यानुभव आणि कृषी औद्योगिक संलग्न’ या उपक्रमांतर्गत डॉ श्रीधर लेले हायस्कूल मुटाट (देवगड) येथील विद्यार्थ्यांना व गावातील शेतकऱ्यांना कृषिदूत आदित्य विरकर, धिरज मस्के, पवनराज लेंडवे, अंगराज मोरे, हर्षवर्धन रणखांबे, प्रसाद देसाई, गणेश माने, प्रदीप पाटील, पृथ्वीनाथ रेड्डी,राजापेटा राजु व प्रो. घरपणकर सर व घुगे सर यांनी वसंतराव नाईक यांच्या जीवनावरती मोलाचे मार्गदर्शन केले. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील गहुली येथे वसंतराव नाईक यांचा जन्म १ जुलै १९१३ रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण हे खेड्यांमध्ये झाले. पुढे त्यांनी विठोली व अमरावती येथे माध्यमिक शिक्षण घेऊन नागपूरच्या मॉरिस कॉलेजमधून बी. ए. ही पदवी घेतली व नंतर एल्एल्. बी ही पदवीही मिळविली. १ जुलैला वसंतराव नाईक यांची जयंती “कृषीदिन “म्हणून साजरी केली जाते. खरं तर १९७२ च्या दुष्काळात सगळी जनता होरपळत होती, लोकांना एकवेळच्या अन्नाची भ्रांत झाली होती, रोजगार नव्हता, पैसा नव्हता… अख्खा महाराष्ट्र झळा सोसत असताना त्यांची कशाला दूरदृष्टी आज महाराष्ट्राच्या शेतीव्यवस्थेला एका वेगळ्या उंचीवर नेण्यास कारणीभूत ठरला.भारतीय आधुनिक कृषी क्षेत्रात वसंतराव नाईक यांचे अमूल्य योगदान आहे. वसंतराव नाईक यांची जयंती “कृषी दिन” म्हणून साजरा करण्याचा निर्णय सन 1989 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी घोषित केला. तेव्हापासून 1 जुलैला शासकीय स्तरावर सर्व कार्यालयात कृषीदिन साजरा केला जातो.
याप्रसंगी लेले हायस्कूलचे प्राचार्य घरपणकर, घुगे शिक्षक व गावचे विद्यमान सरपंच मानसी पुजारे, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी व गावातील काही शेतकरी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे औचित्य साधून कृषीदुतांनी जनजागृतीसाठी पायी कृषीदिंडी आयोजित केली व हायस्कूलच्या आवारात सर्वांसमवेत वृक्षारोपण केले.