सरपंच लता खोत, शिशुपाल राणे यांची टीका
ओरोस (प्रतिनिधी) : दोन दिवसांपूर्वी तळगाव उपसरपंच पेडणेकर यांनी भाजप पक्षात प्रवेशावेळी माजी खासदार विनायक राऊत यांनी गेल्या १० वर्षात तळगावात विकास कामे न झाल्याची खंत व्यक्त केली आहे. पण मुळात गेल्या १० वर्षात तळगाव गावात कोट्यावधी रमृपायांची कामे झाली. याला श्री देव रामेश्वर आणि तळगाव वासीय साक्षीदार आहेत. हे त्रिवार सत्य काल परवापर्यंत स्वतः पेडणेकरही मान्य करत होते. पण केवळ आपले उपसरपंच पद राखण्यासाठी त्यांनी भाजप पक्षात प्रवेश केला आहे. हे तळगावची जनता जाणून आहे. कारण अगोदर ठरल्याप्रमाणे उपसरपंच पद हे अडीच-अडीच वर्षासाठी इच्छुकांमध्ये देण्याचे मान्य झाले होते. आपल्याला अडीच वर्षांनी राजीनामा द्यावा लागेल हे जाणून केवळ आपण व आपली सुन या दोनच शिवसैनिकांनी प्रवेश केला ही वस्तूस्थिती आहे. त्यांच्या जाण्याने संघटनेमध्ये कोणताही परिणाम होणार नाही. कारण ते सात वर्षांपूर्वी राणे समर्थकामधूनच शिवसेनेत आले होते असे निवेदन तळगाव सरपंच लता हरी खोत तसेच उपविभाग प्रमुख शिशुपाल राणे यांनी प्रसिद्धीस दिले आहे.