लोकमान्य टिळक यांची स्वराज्य हक्काची गर्जना आणि अण्णाभाऊ साठे यांचे सामाजिक परिवर्तनाचे माध्यम विद्यार्थ्यांसाठी अंतर्मुख करणारे – प्राचार्य डॉ. पुरंधर नारे

फोंडाघाट महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी

फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीच्या कला व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभाग व विद्यार्थी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने थोर समाजसुधारक, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आणि स्वातंत्र्यसेनानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राचार्य डॉ. पुरंधर नारे यांनी अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमाना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यानंतर प्रमुख वक्ते व इतिहास विभाग प्रमुख लेफ्टनंट डॉ. राज ताडेराव यांनी आपल्या प्रभावी भाषणातून दोन्ही महापुरुषांच्या कार्याचा गौरवपूर्ण आढावा घेतला. डॉ. ताडेराव म्हणाले की, “लोकमान्य टिळकांनी ‘केसरी’ व ‘मराठा’ सारखी वृत्तपत्रे सुरू करून ब्रिटिश सत्तेच्या अन्यायाविरुद्ध निर्भयपणे आवाज उठवला. तुरुंगात असूनही त्यांनी ‘गीतारहस्य’ सारखे ग्रंथ लिहिले. तसेच अण्णाभाऊ साठेंच्या कार्यावर प्रकाश टाकताना त्यांनी सांगितले की, अण्णाभाऊ साठे हे केवळ दीड दिवस शाळेत गेले असले तरी त्यांनी जीवनातील संघर्षातून अनुभवाचे शिक्षण घेतले. त्यांनी आपल्या लेखणीतून कष्टकरी, शेतकरी, शोषित समाजाच्या वेदना मांडल्या. पोवाडे, लोकनाट्य व कथा साहित्याच्या माध्यमातून त्यांनी समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘जग बदल घालून घाव,’ हा त्यांचा घोष आजही प्रेरणादायी आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरंधर नारे म्हणाले की, महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी साजऱ्या करण्यामागचा उद्देश म्हणजे आजच्या युवा पिढीला प्रेरणा देणे. लोकमान्य टिळकांनी ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ अशी गर्जना करत जनतेला स्वातंत्र्यलढ्यात सामील केलं. त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करून लोकांमध्ये राष्ट्रीय चेतना निर्माण केली. अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे. विद्यार्थ्यांनी त्यांचे विचार आत्मसात करून समाजासाठी कार्य केले पाहिजे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व प्रास्ताविक NSS विभागप्रमुख प्रा. विनोदसिंह पाटील यांनी केले. त्यांनी कार्यक्रमामागील उद्देश आणि दोन्ही महापुरुषांचे समाजातील योगदान यावर थोडक्यात प्रकाश टाकला. तर आभार प्रदर्शन विद्यार्थी मंडळ समन्वयक प्रा. डॉ. बालाजी सुरवसे यांनी मानले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, NSS स्वयंसेवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संपूर्ण NSS टीम आणि विद्यार्थी मंडळाने मेहनत घेतली.

error: Content is protected !!