खारेपाटण (प्रतिनिधी) : दलित, शोषित, कष्टकरी जनतेवर होणाऱ्या अन्याय अत्याचारांच्या विरोधात जाब विचारण्यासाठी दलित पँथरच्या माध्यमातून आयोजित केलेल्या मोर्चावर परळ येथे झालेल्या अमानुष दगडफेक व लाठीमारात पँथर – भागवत जाधव हे १० जानेवारी १९७४ रोजी शहीद झाले. तर त्यानंतर रमेश देवरुखकर शहीद झाले. ५० व्या शहीद दिनानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करण्यासाठी, १० जानेवारी २०२४ रोजी, सायंकाळी ४:३० वाजता, छत्रपती शिवाजी मंदिर नाट्यगृह दादर येथे पँथर नेते श्यामदादा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
शहीद भागवत जाधव स्मृती केंद्र आणि झेप संस्था आयोजित अभिवादन सभेत ‘संविधान की मनुस्मृती ?’ या विषयावर महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी, जेष्ठ पत्रकार राजू परुळेकर, मुमताज शेख, सिध्दार्थ मोकळे, वैभव छाया आदी मान्यवर विचारवंत आपले विचार मांडणार आहेत. यावेळी संदेश विठ्ठल उमप व संभाजी भगत आणि सहकारी यांचा ‘जलसा प्रबोधनाचा’ आणि ‘विद्रोही शाहीरी जलसा’ कार्यक्रम सादर होणार आहे. सदर कार्यक्रमाला दलित पँथर संस्थापक सदस्य ज. वि. पवार, साहित्यिक अर्जुन डांगळे, माजी राज्यमंत्री अविनाश महातेकर, सयाजी वाघमारे, सुरेश सावंत, ब्रिगेडीयर सुधीर सावंत यांच्यासह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत. अभिवादन सभेला सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सुमेध जाधव, गौतम जाधव, संजय सावंत व मिलिंद चिंचवलकर यांनी समन्वयक समितीच्या माध्यमातून केले आहे.












