पुरस्कार वितरण, कविसंमेलन आणि सत्कार, ग्रंथ प्रकाशन आदी कार्यक्रमाचे आयोजन
१६ रोजी संमेलन: प्रभा प्रकाशन, अक्षरवैभव तर्फे संमेलनाचे आयोजन
वैभववाडी (प्रतिनिधी) : प्रभा प्रकाशन कणकवली आणि वैभववाडी अक्षरवैभव साहित्य संस्कृती मंचतर्फे रविवार १६ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वा. वैभववाडी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन सभागृहात अक्षरवैभव साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. विख्यात कवी सायमन मार्टिन (वसई) यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या संमेलनाची रूपरेषा जाहीर करण्यात आली असून संमेलनात पुरस्कार वितरण, कविसंमेलन आणि सत्कार, ग्रंथ प्रकाशन आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आली असल्याची माहिती प्रभा प्रकाशनाचे संचालक अजय कांडर आणि अक्षरवैभवचे अध्यक्ष प्रा.एस. एन.पाटील, सचिव चेतन बोडेकर यांनी दिली.
मागील दोन महिने या संमेलनाच्या आयोजनाची तयारी करण्यात येत असून रवींद्र पवार स्वागत अध्यक्ष असलेल्या या संमेलनाचे उद्घाटक म्हणून सामाजिक कार्यकर्ते विजय तावडे आणि प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते संदीप पाटील यांना निमंत्रित करण्यात आले आहे. तर यावेळी विशेष उपस्थित म्हणून समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर, परिवर्तन चळवळीतील कार्यकर्ते प्रशांत जाधव आणि सुप्रसिद्ध सिने दिग्दर्शक दीपक कदम
यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
या संमेलनात प्रभा प्रकाशनातर्फे देण्यात येणारा शालन कांबळे स्मृती माणगाव परिषद गौरव पुरस्कार कादंबरीकार पांडुरंग पाटील यांच्या नांगरमुठी या कादंबरीसाठी तर प्रभावती कांडर स्मृती आवानओल पुरस्कार कादंबरीकार श्वेतल परब यांना त्यांच्या कोल्हाळ या कादंबरीसाठी देऊन गौरविण्यात येणार आहे. तर यावेळी साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य कवी विठ्ठल कदम, अल्लाह ईश्वर या बहुचर्चित काव्यसंग्रहाचे कवी सफरअली इसफ यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. त्याचबरोबर संमेलनाच्या उद्घाटन सत्रात प्रभा प्रकाशन आणि प्रकाशित केलेल्या कवी महावीर कांबळे यांच्या खुरपं या काव्यसंग्रहाचे प्रकाशन संमेलनाध्यक्ष सायमन मार्टिन यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात सुप्रसिद्ध मालवणी कवी प्रा. नामदेव गवळी यांच्या अध्यक्षतेखाली आणि कवी महावीर कांबळे (इचलकरंजी) यांच्या प्रमुख उपस्थित निमंत्रितांचे कवी संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या कविसंमेलनात रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पश्चिम महाराष्ट्र या भागातील पुढील कवींना निमंत्रित करण्यात आले आहे. निमंत्रित कवी – संध्या तांबे, सफरअली इसफ, विठ्ठल कदम, मोहन कुंभार, भालचंद्र सुपेकर, रुजारियो पिंटो, कल्पना बांदेकर, संगीता पाटील, प्रज्ञा मातोंडकर, हरिश्चंद्र भिसे, माधव गावकर, सत्यवान साटम, निकेत पावसकर, प्रा. नंदू हेदुळकर, प्रा.ज्ञानेश्वर सिरसट, प्रा. निलेश कारेकर, संतोष टक्के, डॉ.राजेंद्र पाताडे, नंदिनी पवार-रावराणे, निशिगंधा गावकर, आर्या बागवे, सुधीर गोठणकर, किशोर कदम, प्रेमानंद रावराणे, मंदार चोरगे, निलेश जाधव, शितल पाटील, योगेश सकपाळ, स्वप्नील पाटील, संदेश तुळसणकर, संस्कृती कांबळे, अश्विनी कोकाटे – बिले, श्रेया शेळके, नेहा पवार, डी.एस. पाटील, प्रफुल्ल जाधव, रेखा धावले, सचिन दर्पे, मंगेश चव्हाण, धैर्य बोडेकर, जयवंत मोरे, चेतन बोडेकर, ऋचा पवार, शैलेंद्रकुमार परब, सुनिल कांबळे, मयुरी पेडणेकर, नीता कामत, सायली नारकर, अश्मी जोईल, संदीप कदम, श्रवण वाळवे, अजिंक्य जाधव-शिरगावकर आदी. तरी साहित्य संमेलनात रसिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.











