सानेगुरुजींचे वाङ्मय हे जीवनाचे दीपस्तंभ ! – सुरेश ठाकूर

सानेगुरुजी कथामाला आणि सेवांगण मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने सानेगुरुजी पुण्यतिथीचे आयोजन

आचरा (प्रतिनिधी) : “सानेगुरुजींची पुस्तके ही प्रत्येक पिढीच्या व्यक्तिमत्व विकासाचे दीपस्तंभ आहेत. आज 21 व्या शतकातही गुरुजींची सर्व पुस्तके तरुण पिढीला मार्गदर्शक अशीच आहेत.” असे उद्गार अखिल भारतीय सानेगुरुजी कथामाला मालवणचे अध्यक्ष सुरेश शामराव ठाकूर (ठाकूर गुरुजी) यांनी काढले. पूज्य सानेगुरुजींच्या 76 व्या पुण्यतिथीचे आयोजन केंद्रशाळा आचरे नंबर 1 येथे सानेगुरुजी कथामाला मालवण आणि बॅ. नाथ पै सेवांगण मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. यावेळी आयोजित विद्यार्थी- पालक- शिक्षक यांच्या मेळाव्यात अध्यक्ष स्थानावरून बोलताना श्री ठाकूर पुढे म्हणाले- गुरुजींनी आपल्या जीवनात श्यामची आई पासून सुंदर पत्रेपर्यंत आणि गोड गोड गोष्टींपासून भारतीय संस्कृतीपर्यंत जवळजवळ 73 पुस्तके लिहिली. सर्वच पुस्तके शिक्षक, पालक आणि मुलांसाठी आजही मार्गदर्शक ठरतील अशीच आहेत. यावेळी बॅ. नाथ पै सेवांगण मालवणच्या वतीने 34 गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणनिधीचे वाटप शैलेश खांडाळेकर उपाध्यक्ष बॅ. नाथ पै सेवांगण मालवण यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी शैलेश खंडाळकर यांनी बॅ. नाथ पै सेवांगण मालवणच्या विविध शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्याची माहिती उपस्थितांना दिली. मंदार सांबारी यांनी यावेळी रसिका तेंडुलकर यांची साने गुरुजी जीवनदर्शन ही कविता वाचून रसिकांची मनी जिंकली. यावेळी व्यासपीठावर सदानंद कांबळी उपाध्यक्ष सानेगुरुजी कथामाला मालवण, जयप्रकाश परुळेकर अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती आचरे, सिद्धेश हळवे शिक्षक प्रतिनिधी आचरे नं.1, संजय आचरेकर व्यवस्थापक बॅ. नाथ पै सेवांगण मालवण आदी उपस्थित होते. यावेळी पांडुरंग कोचरेकर उपाध्यक्ष सानेगुरुजी कथामाला मालवण यांनी सानेगुरुजी कथामाला मालवणच्या विविध कार्याची माहिती दिली. यावेळी रावजी तावडे, परशुराम गुरव, संजय परब शारदा बिसेन, मृणालिनी आचरेकर, सायली परब, भावना मुणगेकर, स्मिता जोशी, कामिनी ढेकणे, नेहा बापट या कथामाला कार्यकर्त्यांसोबत जवळजवळ शंभर विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन रामचंद्र कुबल यांनी केले तर आभार मनाली फाटक यांनी मानले.

error: Content is protected !!