शेतकऱ्यांची समृद्धी आणि शाश्वत शेतीसाठी गोकृपा अमृत आणि बायोचर पद्धतीचा पर्याय उपयुक्त– दूर्वा झुलपे

रासायनिक खताचा वापर टाळून, सुधारित पद्धती शेतकऱ्यांसाठी वरदान — मानसी वेर्लेकर

गोकृपा अमृत आणि बायोचर पद्धती बाबत फोंडाघाट येथे प्रात्यक्षिक- उपयुक्तता मार्गदर्शन शिबिर उत्साहात संपन्न !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : जमिनीचा पोत वाढवण्यासाठी रासायनिक खताचा प्रमाणापेक्षा जास्त वापरामुळे, शेतकरी उत्पादनासह, त्यातून उद्भवणाऱ्या विषारी परिणामांना बळी पडला आहे. निसर्गाच्या अवकृपेमुळे खरे तर उत्पादन कमी होऊन,शेती ओस पडत चालली आहे. शेतीला पुनरुज्जीवन देण्यासाठी, शासनाने गोकृपा अमृत आणि बायोचर या दोन बाबींचा वापर, शेतकऱ्यांसाठी समृद्धता आणि शाश्वत शेतीसाठी पर्याय ठरणार आहे.असा विश्वास प्रशासनाने दिला आहे.अर्थात त्याचा अनुभव प्रत्येक शेतकऱ्यांने, बागायतदाराने घेतला तर तो इतर शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल. असा विश्वास मंडळ कृषी अधिकारी- सांगवे, श्रीमती दूर्वा झूलपे यांनी मार्गदर्शन करताना व्यक्त केला….

फोंडाघाट हवेलीनगर येथील प्रगतशील शेतकरी कुमार नाडकर्णी यांच्या बागेत गोकृपा अमृत व बायोचर प्रात्यक्षिक संपन्न झाले. यावेळी उप.कृषी अधिकारी मानसी वेर्लेकर, सहाय्यक कृषी अधिकारी अक्षया परब, गटप्रमुख तृप्ती सावंत, सुभाष मरिये,रमा नाडकर्णी इत्यादी उपस्थित होते. यावेळी गोकृपा अमृत बनविण्याच्या मार्गदर्शनात– श्रीमती झुलपे यांनी २०० लिटर पाण्याच्या टाकीमध्ये दोन लिटर देशी गाईचे ताक,दोन किलो सेंद्रिय गुळ, आणि मूळ संस्कृतीने तयार केलेले गोकृपा अमृत कल्चर घेऊन ते सात दिवस सावलीत ठेवून रोज पाच मिनिटे ढवळावे. त्यानंतर तयार झालेले बॅक्टेरियल कल्चर वापरासाठी इतर शेतकऱ्यांना द्यावे .याचे सादरीकरण यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून करून घेतले …

त्यानंतर उप.कृषी अधिकारी मानसी वेर्लेकर यांनी कचऱ्यापासून बनविलेला मातीचा स्पंज म्हणजे बायोचर ची निर्मिती आणि त्याची उपयुक्तता व वापर याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. शेतातील कार्बन डाय ऑक्साईड चे रूपांतर जैव कोळसा मध्ये केल्यास, पर्यावरण संवर्धनाचा वाटा उचलला जातो. त्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पालापाचोळा, काटक्या उघड्यावर न जळता घरी ड्रम भट्टी किंवा खड्डा पद्धतीने, जैव कोळसा- बायोचर निर्माण करावा. आणि आपल्या शेतीची उपयुक्तता वाढवावी. यावेळी वेर्लेकर यांनी प्रात्यक्षिक करून तयार झालेल्या बायोचरची उपयुक्तता स्पष्ट केली…..

फोंडाघाट, गांगोमाऊली, भूमिपुत्र, सेंद्रिय शेतकरी गट आणि तालुका कृषी विभागातर्फे गोकृपा अमृत आणि बायोचर प्रात्यक्षिक व मार्गदर्शन शिबिराचे प्रास्ताविक- आभार अक्षया परब तर आयोजन तृप्ती सावंत यांनी केले. या शिबिरात राजेश पारकर, श्रीधर सावंत,अशोक नेरुरकर,संतोष भुवड,वसंत तोरस्कर, प्रकाश सावंत, ध्रुवबाळ गोसावी, सुचित्रा बीडये, संजूली शिवगण, शितल रेवडेकर,वैभवी काळगे, रवींद्र पाटकर, प्रकाश लाड, विनायक कुबडे, संजय सावंत, प्रकाश सोमा लाड इत्यादी प्रगतशील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते…

error: Content is protected !!