गोपुरी आश्रम, साद टीम आणि अनुभव शिक्षा केंद्र यांसोबत सामाजिक कार्यकर्त्यांचा सहभाग
कणकवली (प्रतिनिधी): 15 ऑगस्ट, 2023 रोजी भारतीय स्वातंत्र्यदिनाचे आणि अमृत महोत्सवी सांगता समारोहाचे औचित्य साधून कणकवली येथे गोपुरी आश्रम, साद टीम आणि अनुभव शिक्षा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने युवकांनी पुढाकार घेत आझादि की रॅली ह्या रॅलीचे आयोजन केले होते. यावेळी ह्या रॅलीत गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष प्रा. मुंबरकर सर, प्रदीप मांजरेकर, बाळू मेस्त्री, शेख सर, रौनक पटेल, अनिल डेगवेकर, म्हाडगुत, रुपेश जाधव, नार्वेकर, संदेश मयेकर, हरिभाऊ भिसे, सागर वारंग, विनायक सापळे, रोहन कदम, राकेश तांबे, विवेक ताम्हणकर, बाबू राणे, साद टीम अध्यक्ष श्रेयश शिंदे, विशाल गुरव, सुजय जाधव, प्रियांका मेस्त्री, वृदाली हजारे, अनुभव शिक्षा केंद्र चे जिल्हा प्रशिक्षक सहदेव पाटकर, मालिनी लाड, स्नेहल ताम्हणकर, श्रुती पाटणकर, राहुल कांबळे, पल्लवी कोकणी, सिद्धी वरवडेकर आदि युवक-युवती आणि सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते. या रॅलीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी संविधान, आझादी, तसेच अनेक प्रकारच्या उर्जात्मक घोषणा देत ही रॅली पुढे गेली. यावेळी विविध प्रकारची देशभक्तीपर गीते तसेच संविधान गीताने वातावरण मंत्रमुग्ध झाले होते. ही रॅली संविधान निर्मितीकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पुढे पटवर्धन चौक येथे समारोप करण्यात आली. यावेळी विवेक ताम्हणकर यांनी संविधान कसे बनले, त्याचे महत्त्व तसेच भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांनी अगदी कोवळ्या वयात देशासाठी बलिदान दिले आणि तुमच्या सारख्या युवकांनी आज पुढाकार घेऊन त्यांचा वसा पुढे चालवला आहे. या उपक्रमाचे कौतुक करत त्यांनी युवाईच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच संविधान हे तुमच्या मार्फत चिरकाल टिकून राहील, असे मोलाचे मार्गदर्शन केले. तर प्रा. मुंबरकर यांनी युवकांचे चालू असलेले प्रयत्न, त्यांची तळमळ, संविधानाप्रती निष्ठा याबाबत कौतुक केले तसेच आपले विचार हे युवकांपर्यंत कसे पोहोचतील याबाबत बोलून देशात घडणाऱ्या विविध घटना, मणिपूर सारख्या घटनांचा त्यांनी निषेध करत त्यासाठी आपण एकत्र येणं गरजेचं आहे. कारण आज देशात धर्म-जात यावर खूप मोठ्या प्रमाणावर अराजकता वाढत आहे आणि ती कमी करण्यासाठी आपण एकत्र असणे गरजेचे आहे, असे बोलून त्यांनी युवाईला शुभेच्छा दिल्या. शेख सर यांनी उपस्थितांसाठी मिठाईची सोय केली. विशाल गुरव यांनी सर्वांचे आभार मानत या रॅलीची सांगता केली.












