गुरे कचरा खात असल्याने त्यांच्या आरोग्यास धोका
कचरा टाकणाऱ्यांवर कडक कारवाईची गरज
चौके (अमोल गोसावी) : सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा घोषित झाल्यापासून दिवसेंदिवस जिल्ह्यात देश विदेशातील पर्यटकासह पर्यटकांचा ओघ वाढत आहे. लागोपाठ स्थानिक सुट्टी भेटली तर पर्यटकांची मोठी गर्दी कोकणात होते. त्यातच पर्यटनाची राजधानी म्हणून पर्यटक मालवण तारकर्लीला पहिली पसंती देतात. मालवणातील सर्वच पर्यटनस्थळें पर्यटकांना आकर्षित करीत असल्याने वारंवार पर्यटक येत आहेत मात्र येणारा पर्यंटक बेजबाबदाऱपणाने वागत असून पाण्याच्या रिकामी बॉटल, वेफरची पाकिटे प्लास्टिक पिशवी, तसेच अगदी दारुच्या बाटल्या बिनदिक्तपणे गाडीतून मोकळ्या रस्त्याकडेला फेकत आहेत. त्यामुळे रस्त्याच्या साईडपट्टीवर ठिकठिकाणी मोठया प्रमाणावर कचरा दिसत आहे.
आठवडा बाजार करणारे व्यापारी विशेषतः फळ वाले भाजीवाले हे मालवण वरून येताना आणि जाताना बाजार झाल्यावर शिल्लक राहिलेला कचरा आपल्या गाडीतून पुन्हा माघारी घेऊन येतात आणि येताना वाटेत निर्जन स्थळी रस्ता कडेला टाकून निघून जातात. या माळरानावर गावातील शेतकरी आपली गुरे चरण्यासाठी सोडत असतात. ही जनावरे भाजीच्या वासाने कचऱ्याकडे आकर्षित होतात आणि प्लास्टिक पिशवीतील भाजीपाला पिशवीसहीत फस्त करतात त्यामुळे गुरांना गंभीर आजार होऊन गुरे मृत्यूमुखी पडून शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. तसेच जनावरांकडून सर्वत्र पसरविला जातो. घरातील घरातील जुने अडगळीत पडलेले सामान, घर दुरुस्तीसाठी तोडफोड केलेले सामान,फाटके कपडे, जुन्या चपला, काच सामान या मार्गांवर टाकलेले दिसून येते.
याबरोबरच आठवडा बाजारासाठी चौके -बावखोल आणि चौके – कट्टा मार्गावर अशाच प्रकारे बाहेरून येणारे व्यापारी बाजार संपवून जाताना यात प्रामुख्याने भाजीवाले तसेच फळ वाले व्यापारी चौके बावखोलच्या रस्त्या नजीक माळरानावर मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकच्या पिशव्या भरून कचरा टाकत असल्याने सर्वत्र प्लास्टिकच दिसत आहे. या परिसरात इतरही कचरा मोठ्या प्रमाणावर टाकला जातोय.
एक कदम स्वच्छता की और..असा संदेश देत आपल्या देशात सर्वत्र स्वच्छता मोहीम राबवली जात आहे .हे स्वच्छता अभियान चालू असताना मात्र मालवण कसाल तसेच मालवण कुडाळ हा हम रस्ता याला अपवाद ठरत आहे. रस्त्यावरून जाताना काहीं ठिकाणी रस्त्याकडेला दिसणारा हा कचरा दिवसेंदिवस वाढत असून या करऱ्यावर वेळीच निर्बंध आणले नाही तर कचरा वाढत जाईल आणि कचरा टाकणारेही वाढत जातील यात शंका नाही तर काही ठिकाणी या रस्त्यानजिक पुन्हा पुन्हा कचरा टाकला जात असल्याने डम्पिंग ग्राउंड होत असल्याचे दिसून येत आहे.
मालवणवरून येताना काही ठिकाणी वस्ती सोडली तर रस्त्याकडेला पर्यटकांकडून पाण्याच्या प्लास्टिक बॉटल प्लॅस्टिक पिशवी दिसून येतात. यातच आनंदव्हाळ -कार्लाचाव्हाळ येथे रस्त्याकडेला सुरवातीला थोडा दिसणारा कचरा हल्ली वाढताना दिसत आहे.पुढेपुढे हा कचरा चौके पर्यंत रस्त्याच्या गटारात मोट्या प्रमाणवार दिसून येतो.
रस्त्यानजीक गाड्या पार्क करून जेवणावळीचे प्रकार वाढताहेत. –
पर्यटनासाठी येणारे बहुतांशी पर्यटक आपल्या गाड्या घेऊन येत असल्याने नाश्ता जेवणाचे साहित्य घेऊन येतात रस्त्यांनजीक झाडांच्या सावलीखाली शांत ठिकाणी नाश्ता तसेच जेवण बनवून खाताना ठिकठिकाणी दिसतात. नाश्ता आणि जेवण झाल्यानंतर पत्रावळी ग्लास राहिलेले अन्न तिथेच आजूबाजूला टाकले जाते .हल्ली असे प्रकार वाढत जात आहेत.सामान्य जनतेसह शासकीय यंत्रणाही या गोष्टीकडे दुर्लक्ष करीत असल्याने भविष्यात या मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा ठिकठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य दिसून येईल. यावर वेळीच उपाययोजना करून बाहेरून येणारे भाजीपाला फळ विक्रेते पर्यटक असो वा स्थानिक यांच्यावर शासनाने निर्बंध घालून आपल्या जिल्ह्यातील हे प्रमुख रस्ते कसे सुंदर राहतील यासाठी प्रयत्न केला पाहिजे.










