आरमाराची स्थापना हे छ. शिवरायांचे अफाट आणि दूरदर्शी कर्तृत्व- सतीश लळीत

भाईसाहेब सावंत आयुर्वेदिक महाविद्यालयात शिवजयंती साजरी

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सुप्रशासनासाठी अष्टप्रधान मंडळासारखी अभुतपूर्व मुलकी प्रशासकीय व्यवस्था निर्माण करणाऱ्या छ. शिवाजी महाराजांनी समुद्री सत्तेचे महत्व ओळखुन मराठी आरमाराची अत्यंत विचारपुर्वक स्थापना केली. स्वतंत्र आरमार निर्माण करणारे शिवराय हे भारतातील पहिले राजे होते. त्यांचे हे काम अफाट आणि दुरदृष्टीचे आहे, असे प्रतिपादन निवृत्त माहिती उपसंचालक सतीश लळीत यांनी काल केले.

        सावंतवाडी येथील भाईसाहेब सावंत आयुर्वेदिक महाविद्यालयात शिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात 'भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज' या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बी. एस. बांदेकर कॉलेज ऑफ फाईन आर्टचे प्राचार्य दिलीप धोपेश्वरकर होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. डी. पाटील यांनी श्री. लळीत व प्रा. धोपेश्वरकर यांचे स्वागत व सत्कार केला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीपप्रज्ज्वलनांतर छ. शिवरायांच्या आणि धन्वंतरीच्या प्रतिमेला पुष्पहार घालून वंदन करण्यात आले.

        छ. शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापन करताना त्यांच्या मनात असलेले सुराज्य आणि रयतेचे राज्य प्रत्यक्षात आणण्यासाठी जी पावले उचलली, ज्या व्यवस्था निर्माण केल्या, त्याचा सविस्तर आढावा श्री. लळीत यांनी घेतला. ते म्हणाले की, छ. शिवाजी महाराज यांनी स्वत:च्या उपभोगासाठी राज्य स्थापन केले नाही. 'हे राज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा' या भावनेने त्यांनी स्वराज्य उभे केले आणि 'उपभोगशून्य स्वामी' म्हणून कारभार केला. या अर्थाने त्यांचे काम लोकोत्तर आहे. पारदर्शक आणि उत्तरदायी प्रशासन व्यवस्था म्हणजे अष्टप्रधान मंडळाची स्थापना त्यांनी केली. राज्यकारभाराविषयक सुसूत्र नियमावली  म्हणजे 'कानुजाबता' तयार करवून घेतला. नागरी प्रशासन आणि लष्कर स्वतंत्र राहील, याची दक्षता घेतली. पण नागरी किंवा मुलकी प्रशासन हेच सर्वोच्च राहील, अशी व्यवस्था केली. आजही हीच व्यवस्था आपल्या देशात राबवली जाते. मध्ययुगात मुलकी सत्तेचे श्रेष्ठत्व सांगणारा हा थोर नेता भारताच्या इतिहासातही कदाचित एकमेव असेल.

        श्री. लळीत पुढे म्हणाले की, राज्याभिषेक शक सुरु करणे, शिवराई आणि होन ही नाणी पाडून स्वत:चे चलन निर्माण करणे, उत्तम प्रशासकीय व्यवस्था आणि सैन्याबरोबरच कार्यक्षम हेरखाते सुरु करणे, मुद्रा तयार करणे, राजव्यवहार कोश तयार करणे, वतनदारांचे अधिकार मर्यादित करणे, धर्मनिरपेक्ष कारभार करणे अशी कितीतरी लोकोत्तर कामे शिवरायांनी केली. मात्र स्वतंत्र आरमाराची स्थापना करुन स्वराज्याच्या सागरी सीमा सुरक्षित करणे, अनेक जलदुर्ग आणि सागरी दुर्गांची साखळी उभी करणे, हे त्यांचे कार्य अतुलनीय आहे. आज भारताचे नौदल जगातील सर्वात बलाढ्य नौदलांपैकी एक आहे, त्याचे कारण शिवरायांचा नौदल व आरमाराविषयीचा दृष्टिकोन आधुनिक भारताने स्वीकारला. छत्रपती शिवरायांनी आपल्या कारकिर्दीत एक अत्यंत महत्वाचे कार्य केले ते म्हणजे एक बलाढ्य आरमार उभे करून भारताचा समुद्र किनारा सुरक्षित केला.

        रामचंद्रपंत अमात्य यांनी अतिशय मोजक्या अचूक शब्दात शिवरायांचे आरमारविषयक विचार ग्रथित करुन ठेवले आहेत. 'आरमार म्हणजे स्वतंत्र एक राज्यांगच आहे. जसे ज्यास अश्वबल त्याची पृथ्वी प्रजा आहे, तद्वतच ज्याच्याजवळ आरमार त्याचा समुद्र. याकरता आरमार अवश्यमेव करावे', असे आरमाराचे महत्व आज्ञापत्रात वर्णन केले आहे. महाराजांची आरमारविषयक संपूर्ण राजनीती आज्ञापत्रात व्यक्त झालेली दिसते. इंग्रज, पोर्तुगिज, फ्रेंच, डच, सिद्दी यांच्यासारख्या परकीय शक्तींना काबूत ठेवण्यासाठी, व्यापारउदीम सुरळीत चालण्यासाठी समुद्रावर सत्ता असली पाहिजे, हे त्यांनी ओळखले. सेनासरखेल कान्होजी आंग्रे यांना पहिले नौदलप्रमुख नेमून, विविध प्रकारच्या गलबतांची बांधणी करुन आणि सिंधुदुर्गसारखा अभेद्य जलदुर्ग उभारुन महाराजांनी एक समर्थ आणि सक्षम आरमार निर्माण केले. महाराजांच्या इतर कर्तृत्त्वाइतकेच आरमार निर्मिती हे त्यांचे कार्यही अजोड आणि अतुलनीय आहे. छ. शिवरायांचा अभ्यास करताना त्यांचा हा पैलुही लक्षात घेणे गरजेचे आहे, असे श्री. लळीत म्हणाले.

        अध्यक्षपदावरुन बोलताना प्रा. धोपेश्वरकर यांनी वैद्यकीय विद्यार्थ्यांना कलाविषयक मार्गदर्शन केले. वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या चित्रस्पर्धेचे पारितोषिक वितरण त्यांच्याहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला उपप्राचार्य प्रा. डॉ. संजय दळवी, डॉ. साईनाथ सितावार ( विद्यार्थी संघ कार्याध्यक्ष), डॉ. विनोद काठाने, डॉ. प्रवीणकुमार ठाकरे, डॉ. मुग्धा  ठाकरे, डॉ. शितल पाटील, डॉ. राजेंद्र पाटील

विद्यार्थी सांस्कृतिक प्रतिनिधी जयराज मरकड, शुभांगी खैरे, सूत्रसंचालन करणाऱ्या विद्यार्थिनी – आकांक्षा फुके, शिवाई भांडे, जनरल सेक्रेटरी शिवानी सिंह, डॉ. सई लळीत व अन्य मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!