मंडगाव पनवेल ट्रेन ची वातानुकूलित बाेगी बंद ; प्रवाशांचे झाले हाल

ट्रेन वैभववाडी रेल्वे स्थानकात येताच संतप्त प्रवाशांनी राेखून धरली

वैभववाडी (प्रतिनिधी) : मंडगाव पनवेल या जादा रेल्वे गाडीच्या वातानुकूलित बोगीतील एसी बंद पडल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. संतप्त प्रवाशांनी ट्रेन वैभववाडी स्थानकात आल्यानंतर तब्बल अर्धा तास रोखून धरली. यावेळी रेल्वे प्रशासनाने  येथे एसी दुरुस्त करण्याचे आश्वासन दिल्यानंतर रेल्वे रत्नागिरीच्या दिशेने मार्गस्थ झाली.ही घटना रविवारी दुपारी 1.30 वाजण्याच्या वाजण्याच्या सुमारास घडली.

गणेश उत्सवानंतर चाकरमानी परतीच्या प्रवासाला निघत आहेत. त्यामुळे कोकण रेल्वे सह एस. टी. बस, खाजगी आराम बस, अशा मिळेल त्या वाहनाने मुंबई पुणे शहराकडे जात आहेत. त्यामुळे सगळीकडे गर्दी आहे. कोकण रेल्वेने प्रवाशांची होणारी गर्दी विचारात घेऊन जादा गाड्या सोडल्या आहेत. त्यातीलच मडगाव पनवेल  ही जादा गाडी रविवारी सकाळी साडेनऊ वाजता पनवेल साठी मार्गस्थ करण्यात आली. या रेल्वेतील वातानुकूलित बोगीतील वातानुकूलित यंत्रणा बंद असल्याचे प्रवाशांच्या लक्षात आले. प्रवाशांनी ही बाब कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांच्याकडून कणकवली एसीतील बिघाड दुरुस्त करण्यात येईल असे सांगण्यात आले. मात्र कणकवली तिथेही  दुरुस्ती न करता गाडी तशीच पुढे मार्गस्थ करण्यात आली.

गेले दोन दिवस वातावरणात अचानक झालेल्या बदलामुळे उष्णतेत वाढ झालेली आहे त्यामुळे या हवा बंद असलेल्या भोगीतील प्रवाशी उष्णतेने चांगले हैराण झाले. लहान मुले वयोवृद्ध आजारी प्रवासी यांना प्रवास असह्य होऊ लागला. प्रवाशी घामघूम झाले. त्यांनी बोगीचा दरवाजा उघडा ठेऊन प्रवास करण्याची वेळ आली. त्यामुळे ट्रेन जशी वैभववाडी रेल्वे स्टेशनवर थांबली तसे या भोगीतील संतप्त प्रवाशांनी खाली उतरून स्टेशन मास्तर व त्या ठिकाणी उपस्थित असलेले रेल्वे पोलीस यांना चांगलेच धारेवर धरले. आम्ही जादा पैसे देऊन आगाऊ आरक्षण करून आम्हाला जर त्या प्रकारची सेवा मिळणार नसेल  तर त्याचा काय उपयोग या? पॅकबंद बोगीतून आम्ही प्रवास करायचा कसा? असा संतप्त सवाल प्रवाशांकडून करण्यात आला. अखेर संतप्त प्रवाशांना शांत करत स्टेशन मास्तर यांनी एसीच्या तांत्रिक बिघाडामध्ये रत्नागिरी स्टेशनवर दुरुस्ती करण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतर प्रवासी थोडे शांत होत त्यांनी पुढच्या प्रवासाला संमती दिली. त्यानंतर ट्रेन मार्गस्थ करण्यात आली. दरम्यानच्या काळात वैभववाडी स्टेशनवर काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!