सासोली जमीन गैरव्यवहार प्रकरणी संदेश पारकर यांच्या आंदोलनाला आमदार वैभव नाईक यांचा पाठींबा

महसूल विभागाच्या अनागोंदी कारभाराकडे राज्याच्या महसूल सचिवांचे लक्ष वेधणार

बेकायदेशीर अकृषिक सनदा रद्द करण्याची आणि दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाच्या कारवाईची मागणी करणार- आमदार वैभव नाईक

कणकवली (प्रतिनिधी) : सासोली येथे गुजराती परप्रांतीय धनदांडग्यांच्या कंपनीने तेथील काही ग्रामस्थांच्या सामाईक जमिनी सरकारी यंत्रणांना हाताशी धरून बळकावल्या आहेत. त्याविरोधात ग्रामस्थांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी आवाज उठवीत २४ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता दोडामार्ग तहसील कार्यालय येथे तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. या आंदोलनाला कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी पाठींबा दिला आहे.तसेच या जमीन गैरव्यवहार प्रकरणी राज्याच्या महसूल सचिवांची भेट घेऊन महसूल विभागाच्या अनागोंदी कारभाराकडे सचिवांचे लक्ष वेधले जाणार आहे. महसूल विभागाने बेकायदेशीर केलेल्या नोंदी, बेकायदेशीर दिलेल्या अकृषिक सनदा रद्द करण्याची आणि दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून निलंबनाच्या कारवाईची मागणी करणार असल्याचे आमदार वैभव नाईक यांनी सांगितले आहे.

   आमदार वैभव नाईक म्हणाले, शिंदे- फडणवीस सरकारच्या वरदहस्तामुळे गुजराती परप्रांतीय हे महसूल यंत्रणेला हाताशी धरून अनेक ठिकाणी गैरव्यवहार करीत आहेत. जे खरोखर शेती करतात त्या सामान्य शेतकऱ्यांना महसूल विभागातून शेती दाखले मिळत नाहीत. मात्र गुजराती परप्रांतीय धनदांडग्यांना  तात्काळ शेती दाखले देऊन सामान्य नागरिकांच्या जमिनी बेकायदेशीर रित्या परप्रांतीयांच्या नावावर केल्या जातात. सामान्य शेतकऱ्यांना वेगळा न्याय आणि गुजराती परप्रांतीय धनदांडग्यांना वेगळा न्याय अशी भूमिका अधिकारी घेत आहेत. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या भष्ट्राचारी सरकार विरोधात आणि गुजराती परप्रांतियांविरोधात सिंधुदुर्ग वासियांनी भूमिका घ्यावी असे आवाहन आमदार वैभव नाईक यांनी केले आहे. 

        सासोली येथे गुजराती परप्रांतीय धनदांडग्यांच्या कंपनीने तेथील काही ग्रामस्थांच्या सामाईक जमिनी शेती करण्याच्या निमित्ताने कवडीमोल दरात खरेदी केल्या. मात्र त्याच जमिनी आता करोडोंच्या किंमतीने विकत आहेत. यासाठी महसूल विभागाने सहहिस्सेदारांना नोटीस न पाठविता गुजराती परप्रांतीय धनदांडग्यांना अकृषिक सनदा दिल्या.परप्रांतीय धनदांडग्यांनी केवळ ३५० एकर जमीन खरेदी केली असताना  सरकारी यंत्रणांना हाताशी धरून ते ग्रामस्थांची ८०० एकर जमीन बळकावत आहेत. यासाठी कंपनीने मोठ्या प्रमाणात काळया पैशांचा वापर केला आहे.  महसूल, पोलीस, वन, भूमिअभिलेख व सासोली ग्रामपंचायत प्रशासन यांचे गुजराती परप्रांतीय धनदांडग्यांच्या कंपनीसोबत आर्थिक हितसंबंध असल्यानेच बेकायदेशीर रित्या ग्रामस्थांच्या सामाईक जमिनी बळकावण्यात आल्या आहेत. त्यामुळे दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून निलंबनाची कारवाई व्हावी. कंपनीने केलेल्या गैरव्यवहाराची ईडीकडून चौकशी व्हावी आणि ग्रामस्थांना न्याय मिळावा यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी आवाज उठवीत  २४ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता दोडामार्ग तहसील कार्यालय येथे तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. या आंदोलनाला कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी पाठींबा दिला आहे.या जमीन गैरव्यवहार प्रकरणी राज्याच्या महसूल सचिवांची भेट घेऊन महसूल विभागाच्या अनागोंदी कारभाराकडे सचिवांचे लक्ष वेधले जाणार आहे. महसूल विभागाने बेकायदेशीर केलेल्या नोंदी, बेकायदेशीर अकृषिक सनदा रद्द करण्याची आणि दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून निलंबनाच्या कारवाईची मागणी करणार असल्याचे आमदार वैभव नाईक यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!