काजू ,आंबा पिकाला फटका
वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यात मंगळवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता. त्यामुळे उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला. मात्र या वादळी पावसामुळे अंतिम टप्प्यात असलेले काजू पीक, आंबा पिकाला फटका बसला आहे.
गेले काही दिवस तापमानात प्रचंड वाढ झाली असून ४० डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान गेले होते.मंगळवारी सायंकाळी ढगाळ वातावरण झाले. त्यानंतर जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी बरसल्या. त्यामुळे हवामान खात्याने व्यक्त केलेला अंदाज खरा ठरला आहे.वैभववाडी शहरासह आसपासच्या परिसरामध्ये सायंकाळी चार तीस च्या सुमारास वादळी वारे ढगांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांना काही काळ दिलासा मिळाला आहे.मात्र अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे आंबा काजू पिकाचे नुकसान होणार असल्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.












