रत्नागिरीत भास्कर जाधव देणार उदय सामंतांना आव्हान ?

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी ) : कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र, शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर ठाकरे गटाचीताकद कमी झालेय. शिंदे गटात शिवसेनेचे अनेक आमदार गेल्याने कोकणात नव्याने बांधणी करण्याची तयारी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. दापोली-मंडणगड मतदार संघ आणि रत्नागिरी मतदार संघावर लक्ष्य केंद्रीत करण्यात सुरुवात केली आहे. दापोली-मंडणगडमधील माजी आमदार संजय कदम यांना पक्षात घेण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. कारण या दोन्ही संघातील आमदार शिंदे गटात दाखल झालेत. त्यामुळे आता रत्नागिरीतून उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याविरोधात तगडा उमेदवार देण्याची तयारी ठाकरे गटाकडून आहे. त्याची चाचपणीही सुरु झालेय. दरम्यान, भास्कर जाधव यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना म्हटलंय, आमचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आदेश दिले तर रत्नागिरीतूनही निवडणूक लढवू.

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनेचे नेते (ठाकरे गट) भास्कर जाधव आणि बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षाचे नेते रामदास कदम यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले आहेत. उद्धव ठाकरे यांनी भास्कर जाधव यांची नेतेपदी निवड करुन त्यांना मोठे राजकीय बळ देण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या तेच ठाकरे गटात आक्रमक नेते आहेत. त्यामुळे रत्नागिरी मतदारसंघातबाबत केलेले विधान याला महत्व प्राप्त झाले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरीतून लढण्यास सांगितलं तरी लढेन, असं भास्कर जाधव यांनी म्हटले आहे. विश्वासघात करणाऱ्यांविरोधात लढण्यास उद्धव ठाकरे यांनी सांगितलं तर कुठूनही लढेन असं भास्कर जाधव यांनी म्हटले आहे. त्यामुळे ते वेळ पडल्यास रत्नागिरीतून लढू शकतात, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. जर जाधव हे रत्नागिरीतून निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर उद्योगमंत्री उदय सामंत यांना तगडे आव्हान उभे राहू शकते. जाधव आणि सामंत हे दोघेही कट्टर विरोधक आहेत.

त्याआधी भास्कर जाधव हे गुहागर मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले त्यांचे पुत्र विक्रांत जाधव यांनीच गुहागर मतदारसंघावर दावा सांगितला आहे. विक्रांत जाधव हे रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मावळते अध्यक्ष आहेत. गुहागर मतदारसंघातून आमदार व्हायला आवडेल, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले होते. त्यामुळे विक्रांत जाधव हे गुहागरमधून लढल्यास भास्कर जाधव कुठून लढणार यावरुन जोरदार राजकीय चर्चा रंगली असताना आता भास्कर जाधव यांनी पक्षाचा आदेश आला तर रत्नागिरीतून लढणार असं म्हटले आहे. यामुळे भास्कर जाधव हे आपल्या मुलाला गुहागर हा मतदारसंघ सोडू शकतात, अशी आता चर्चा रंगली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!