न्यायाला उशीर म्हणजे अन्याय; सर्वोच्च न्यायालयाने आता कृती दाखवावी
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : काल सामानाच्या मथळ्यात, “सर्वोच्च न्यायालयाने, आता बोलल्या प्रमाणे करावे” ही कानपिचकी मिळाली. ‘बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले’, असे संत सांगून गेले. परंतु बोलाची भात आणि बोलाची कडी देऊन, कोणाचे मन संतुष्ट करता येईल, पण भूक नाही, असेही म्हणीत सांगितले जाते. आता तर ‘justice delay is justice denied’ हे बोधवाक्य लक्षात ठेवून “तारखा” न देता “सारखा” खटला चालवून सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेला न्याय देण्यासाठी पाऊले उचलली पाहिजेत, अशी भूमिका शिवसेना उबाठा चे जिल्हा कार्यकारणी सदस्य संदीप सरवणकर यांनी मांडली आहे.
न्याय पालिका ही स्वतंत्र संस्था असून, भारताच्या लोकशाहीचा ती तिसरा खांब आहे. आता हा खांब तंबूच्या ओझ्याने झुकला तर, यांना ‘सर्वोच्च’ का म्हणावे? असा प्रश्न सामन्याच्या डोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. न्यायालय ही लोकशाहीची स्वतंत्र आणि सर्वोच्च संस्था आहे. तिचा आदर राखणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. पण न्याय संस्थेनेही स्वतःच्या कार्यक्षमतेने आणि निर्भय निर्णयांनी तो आदर टिकवून ठेवणे आवश्यक असल्याचे सरवणकर यांनी म्हटले आहे.












