वैभववाडी (प्रतिनिधी) : आठ दिवसाच्या विश्रांतीनंतर बुधवारी संपूर्ण वैभववाडी तालुक्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने झोडपून काढले. सुमारे दोन तास लागलेल्या जोरदार पावसाने वैभववाडी शहरात पाणीच पाणी झाले होते. अचानक आलेल्या पावसाने आठवडा बाजारासाठी आलेल्या फिरत्या व्यापाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. तर कापलेल्या भात शेतीचे नुकसान झाले आहे.
आठ दिवस पावसाने उघडीप दिल्यामुळे सध्या तालुक्यात भात कापणीला जोरदार सुरुवात झाली आहे. गेले दोन दिवस आक्टोबर हिटने नागरिक हैराण झाले होते. त्यातच बुधवारी दुपारी ३.३० नंतर अचानक तालुक्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरु झाला. अचानक आलेल्या पावसाने कापून ठेवलेले भात पिकाचे नुकसान झाले आहे. तर काही ठिकाणी या मुसळधार पावसाने भात शेती आडवी झाली आहे. त्यामुळे पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे.
बुधवारी वैभववाडी शहराचा आठवडा बाजार असतो. आठवडा बाजारासाठी आलेले व्यापारी व ग्राहकांची चांगलीच तारांबळ उडाली. शहरात नव्याने बांधलेल्या गटारातून पाणी न जात रस्त्यावर वाहत होते त्यामुळे शहरात रस्त्यावर सगळीकडे पाणीच पाणी झाले होते.












