मधु दंडवते यांच्या पुण्यतिथी निमित्त स्मरण
कणकवली (प्रतिनिधी) : कोंकण आपला प्रांत नसूनही कोंकणी जनतेने दाखविलेल्या विश्वास व प्रेमाखातर कोंकण रेल्वेचे स्वप्न साकार करणाऱ्या मधु दंडवते यांना कोंकण रेल्वे अस्तित्वात आल्यानंतर मात्र कोंकणी जनतेने निवडणुकीत का पाडले ? या प्रश्नाचे उत्तर मला आणि अखेर पर्यंत नाना दंडवते यानाही सापडले नाही. आजही विचारवंत कोंकणी जनतेची ही सल राहिली आहे, अशा शब्दात ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर यांनी मधु दंडवते यांच्याविषयी शल्य व्यक्त केले.
अशोक करंबेळकर कणकवली रेल्वे स्टेशन येथे मधु दंडवते यांच्या २१ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित स्मृती वंदना कार्यक्रमात बोलत होते. अलिकडचे राजकारणी प्रत्येक गोष्टीत राजकारण पाहतात, पण दंडवते यांचे तसे नव्हते. राजकारणाचा वापर ते समाजकारणाला गती मिळावी म्हणून करीत असत. यामुळे साम्यवादी विचारसरणीची एन्.आर्.एम्.यू. ही कर्मचारी संघटना समाजवादी विचारसरणीच्या मधु दंडवते यांचे गेली २० वर्षे निस्पृहपणे स्मरण करते, ही बाब सुद्धा मधु दंडवते यांचा मोठेपणा सिद्ध करते, असेही ते पुढे म्हणाले. मधु दंडवते यांचे थोर विचार आचरणात आणणे हीच खऱ्या अर्थाने त्यांना श्रद्धांजली होईल, असेही प्रतिपादन त्यांनी केले.
कोकण रेल्वेचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या मधु दंडवते यांचे स्मरण करणे हे प्रत्येक कोकणी जनतेचे, कोकण रेल्वे कर्मचारी, कोकण रेल्वेवर अवलंबून असणाऱ्या व्यावसायिकांचे आणि दंडवते प्रेमींचे आद्य कर्तव्य आहे. त्यांचे स्मरण करणे हीच खरी कृतज्ञता आहे, अशा शब्दात पत्रकार विजय गांवकर यांनी मधु दंडवते स्मृति वंदना वाहिली.
कार्यक्रमात कोकण रेल्वे मजदूर युनियनचे पदाधिकारी रमाकांत नाडकर्णी, तांत्रिक अधिकारी सुहास बावधनकर, मुख्य स्टेशन मास्तर आनंद चिपळूणकर यांनी देखील दंडवते यांचे स्मरण केले. कार्यक्रमाला कोकण रेल्वेचे संतोष बापट, प्रशांत तांबे, भाऊ चीरेकर, प्रमोद गुंडे, भाई परब, सचिन सरंगले, संतोष नारकर, संजय पाटील आदी कर्मचारी आणि बहुसंख्येने प्रवासी उपस्थित होते.












