कस्तुरी पाताडे हिला कासार्डे ग्रामस्थांची श्रद्धांजली
कणकवली (प्रतिनिधी) : वैद्यकीय उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या कस्तुरी पाताडे हिला आज कासार्डे ग्रामस्थांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या वेळी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच कस्तुरीचा मृत्यू झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे, दोषी डॉक्टरांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, मृत्यू झालेली मुलगी आम्हाला परत द्या, अन्यथा कुठलेही गुन्हे घेण्यासाठी आम्ही तयार आहोत, अशी तीव्र भावना व्यक्त करण्यात आली.
“दहा कोटी रुपये दिले तरी आमची मुलगी परत येणार नाही. पैशांपेक्षा आम्हाला न्याय महत्त्वाचा आहे,” असे माजी उपसभापती प्रकाश पारकर यांनी यावेळी सांगितले. कस्तुरी पाताडेच्या मृत्यूमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली असून संतप्त ग्रामस्थांनी न्यायासाठी एकजुटीने उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य संजय देसाई, माजी बांधकाम सभापती रविंद्र जठार, माजी पंचायत समिती सभापती दिलीप तळेकर, कासार्डे सरपंच निशा नकाशे, उपसरपंच गणेश पाताडे, निवृत्त पोलिस अधिकारी सूर्यकांत तळेकर, माजी सरपंच संतोष पारकर, रविंद्र पाताडे तसेच परिसरातील सरपंच, उपसरपंच आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.










