हवामानावर आधारित फळ पिक विमा योजनेत नारळ-सुपारीचा समावेश, आंबा विमा कालावधी ३१ मे पर्यंत वाढवला :मनीष दळवी

सिंधुनगरी (प्रतिनीधी) : पुनर्रचित हवामानावर आधारित फळ पिक विमा योजनेंतर्गत शासनाने जिल्ह्यातील बागायतदारांच्या दृष्टीने महत्त्वाचे दोन सुधारित बदल केले आहेत, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी दिली. आतापर्यंत या योजनेंतर्गत कोकणातील आंबा, काजू व केळी या तीन पिकांनाच विमा संरक्षण दिले जात होते. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर लागवड असलेली नारळ व सुपारी ही पिके मात्र विम्याच्या कार्यक्षेत्रात येत नव्हती. त्यामुळे किनारपट्टी भागातील बागायतदार सदर योजनेपासून वंचित राहत होते. बदलत्या हवामानाचा विपरीत परिणाम या पिकांवर होत असल्याने त्यांनाही विमा संरक्षणाची नितांत गरज होती.
तसेच, आंबा पिकाच्या विम्याचा कालावधी पूर्वी १५ मे पर्यंत होता. गेल्या ३-४ वर्षांत १५मे नंतर झालेल्या अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान होत होते. या दोन्ही बाबींची दखल घेऊन सिंंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मा. नितेशजी राणे यांच्याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मागणी केली होती. पालकमंत्री महोदयांनी या सूचनांचा पाठपुरावा करून सन २०२७-२७ च्या पिक विमा धोरणामध्ये महत्त्वपूर्ण बदल घडवून आणले आहेत.

केलेले सुधारित बदल
१) नवीन पिकांचा समावेश : आंबा, काजू व केळी या पिकांबरोबरच आता नारळ व सुपारी या दोन पिकांचाही विमा योजनेत अंतर्भाव करण्यात आला आहे.
२) कालावधी वाढ : आंबा पिकासाठी विम्याचा कालावधी १५ मे वरून ३१ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे.

या दोन्ही निर्णयांमुळे जिल्ह्यातील आंबा, काजू, नारळ व सुपारी बागायतदारांना त्यांची पिके सुरक्षित करण्यास मोठी मदत होणार आहे. जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी सदर पिक विमा योजनेत सहभाग घेऊन आपली फळबागायती विमा संरक्षित करावी, असे आवाहन मनीष दळवी यांनी केले आहे. शासनाने केलेल्या या सुधारणांबद्दल त्यांनी पालकमंत्री मा. नितेशजी राणे व राज्य शासनाचे आभारही मानले आहेत.

error: Content is protected !!