मुख्यमंत्री कार्यालयाचे निर्देश आणि पालकमंत्री नितेश राणे घेतलेल्या कामाच्या आढाव्यामुळे यंत्रणा गतिमान; २८ ट्रांसफार्मर सुरू
५०० अतिरिक्त खांब सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी उपलब्ध
२४५ कर्मचारी अहोरात्र कार्यरत; १६ गावे व १२ वाड्यांतील वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम अंतिम टप्प्यात
कणकवली (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री कार्यालयाने पालकमंत्री नितेश राणे यांच्या समवेत MSEB विभागाची उच्चस्तरीय बैठक घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्या ज्या गावांमध्ये वीज पुरवठा खंडित झालेला आहे. तो वीजपुरवठा सुरळीत करण्याची सूचना दिली होती. सरकारच याप्रकरणी ॲक्शन मोडवर आल्यावर प्रशासन अधिक गतिमान झाले. एका दिवसात ५११ विजेचे पोल उभे केले व २८ ट्रांसफार्मर दुरुस्त करून त्या ठिकाणाहून वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. ५०० खांब मेजर स्टोर मधून सिंधुदुर्ग साठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे येत्या दोन दिवसात वीजपुरवठा सुरळीत पूर्ववत होईल असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. २४५ कर्मचारी हा वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी दिवस रात्र काम करत आहेत. पावसाने उसंत घेतली असल्यामुळे कामाला आणखीनच गती आलेली आहे.
सोमवार दि. ०६ जुलै २०२६ पासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी वारे, पाउस सुरू झाल्यामुळे महावितरणच्या वीज वितरण प्रणालींचे जसे की विद्युत् खांब, रोहित्र, विद्युत् वाहिनी यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये उच्चदाब वाहिनीचे २८२ खांब आणि लघुदाब वाहिनीचे ४१७ खांब पडले असून एकूण २८ रोहित्र बंद पडले आहेत. अशा अभूतपूर्व आणि कठीण परिस्थितीत सिंधुदुर्ग मंडळांतर्गत योग्यप्रकारे नियोजन करून आजपर्यंत उच्चदाब वाहिनीचे १९६ खांब आणि लघुदाब वाहिनीचे ३१५ खांब पूर्ववत उभे केले. उर्वरित उच्चदाब वाहिनीचे ३६ व लघुदाब वाहिनीचे १०२ खांब पूर्ववत करणेसाठी नियोजन करून ते काम प्रगतीपथावर आहे. नादुरुस्त झालेले सर्व २८ रोहित्र दुरुस्त झाले असून त्याद्वारे विद्युत पुरवठा सुरळीत केला आहे. काल दि. ०९ जुलै २०२६ रोजी झालेल्या उच्चतर बैठकीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अतिरिक्त ५०० खांब उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
या नैसर्गिक हानीमध्ये सर्वाधिक नुकसान दोडामार्ग तालुक्यात झाले असून त्यासाठी महावितरणतर्फे १० कंत्राटदार व त्यांचे सुमारे १०० कर्मचारी अहोरात्र मेहनत घेत आहेत. त्याखालोखाल सावंतवाडी येथे ७ कंत्राटदारामार्फत ६६ कर्मचारी, कुडाळ येथे ५ कंत्राटदारामार्फत ४५ कर्मचारी, वेंगुर्ला येथे ४ कंत्राटदारामार्फत ४० कर्मचारी विद्युत् पुरवठा सुरळीत करणेसाठी काम करत आहेत. याशिवाय कणकवली, वैभववाडी, मालवण व देवगड तालुक्यातील सर्व गावांमध्ये विद्युत् पुरवठा सुरळीत करण्यात आला असून उर्वरित वाड्यांसाठी १२ कंत्राटदार नियुक्त केले आहेत. सद्यस्थितीत एकूण १६ गावे व १२ वाड्यांमध्ये विद्युत पुरवठा बंद असून तो सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे.











