बांदा (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील इन्सुली खामदेव नाका येथे सुमारे २५ ते ३० कोटी रुपये खर्च करून नव्याने उभारण्यात आलेल्या बॉक्सवेल उड्डाणपुलाला आणि लगतच्या सर्व्हिस रोडला मोठ्या प्रमाणावर भेगा (तडे) गेल्याचा प्रकार समोर आला आहे. या निकृष्ट कामाविरोधात स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते साईप्रसाद राणे व इन्सुली ग्रामस्थांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या मुख्य अभियंता वृषाली पाटील यांना निवेदन सादर केले. पावसाचा जोर कमी असतानाही पुलाचा भराव खचला असून ठेकेदाराकडून या गंभीर प्रकारावर केवळ डांबर व सिमेंट टाकून मलमपट्टी करण्याचे काम सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. कामाच्या या निकृष्ट दर्जामुळे सध्या हजारो वाहनांची धोकादायक वाहतूक सुरू असून अपघाताची टांगती तलवार निर्माण झाली आहे.
निवेदनात त्यांनी म्हटले की, वाहतूक सुरू असताना दुर्घटना घडल्यास किंवा जीवितहानी झाल्यास त्याची संपूर्ण कायदेशीर व नैतिक जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग विभाग की संबंधित ठेकेदाराची, हे प्रशासनाने स्पष्ट करावे. या कामाच्या दर्जावर देखरेख ठेवणाऱ्या जबाबदार अभियंत्याची आणि ठेकेदाराची तात्काळ खातेनिहाय सखोल चौकशी करण्यात यावी. पुलाचे काम पूर्ण आणि तांत्रिकदृष्ट्या सुरक्षित नसल्यास यावरून होणारी वाहतूक तात्काळ थांबवून तज्ज्ञांमार्फत संपूर्ण पुलाची व सर्व्हिस रोडची योग्य दुरुस्ती करण्यात यावी. निवेदन स्वीकारल्यानंतर मुख्य अभियंता वृषाली पाटील यांनी निवेदनातील विषयावर “तात्काळ योग्य ती कारवाई केली जाईल,” असे आश्वासन उपस्थितांना दिले. सदर निवेदनावर सामाजिक कार्यकर्ते साईप्रसाद राणे यांची स्वाक्षरी असून, निवेदन देतेवेळी हेमंत नाईक, सिद्धेश मोरजकर, नचिकेत सावंत यांच्यासह इन्सुलि ग्रामस्थ उपस्थित होते. येत्या चार दिवसांत यावर योग्य ती लेखी कारवाई न झाल्यास नागरिकांच्या सुरक्षेसाठी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी स्थानिकांनी दिला आहे.
इन्सुली उड्डाणपुलाच्या निकृष्ट कामाबाबत साईप्रसाद राणे यांचे राष्ट्रीय महामार्ग विभागाला निवेदन












