मालवण (प्रतिनिधी) : गेले काही दिवस सातत्याने पाऊस सुरु असताना भर पावसात मालवण तालुक्यातील कोळंब गावाला पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. गेले तीन महिने नळाला पाणीच न आल्याने संतप्त कोळंब ग्रामस्थांनी मंगळवारी ग्रामपंचायतीला धडक दिली. एवढा पाऊस पडूनही पाणी येत नसेल तर ग्रामस्थांनी करायचे काय? असा सवाल ग्रामस्थांनी केला. यावर सरपंच सिया धुरी, उपसरपंच विजय नेमळेकर यांनी सदरची पाईपलाईन जुनी झाली असून वारंवार फुटत आहे. चार दिवसात पाईपलाईन दुरुस्त करण्यात येईल त्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत होईल असे सांगितले.
गेले तीन महिने कोळंब गावाला पाणी टंचाई भेडसावत आहे. उन्हाळ्यात विहिरीला पाणी नसल्याने ग्रामस्थ पाण्यापासून वंचित राहिले होते. त्यात पाऊस उशिरा आल्याने जुन महिन्यातही भिषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागले. आता मुसळधार पाऊस पडल्याने विहिरीलाही पाणीसाठा भरपूर आहे. तरीही पाणी न आल्याने संतप्त कोळंब टेंबवाडी येथील ग्रामस्थांनी भर पावसात ग्रामपंचायतला धडक दिली. यावेळी माजी बांधकाम सभापती अनिल न्हीवेकर, ग्रामपंचायत सदस्य भाऊ फणसेकर, विनायक धुरी, भाई ढोलम, प्रसाद भोजणे, दीपक भोजणे, सचिन नरे, सरिता हडकर, उजवला भोजणे, मंदाकिणी हडकर, नमिता नरे, बाबू धुरी, उत्तम भोजणे, गणेश पेडणेकर, सुशांत भोजणे, राजू हडकर, रवींद्र जेठे, यासह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.












