भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा आम्रपाली साळवे व प्रदेश सचिव शिल्पाताई मराठे यांचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केले स्वागत

कणकवली (प्रतिनिधी): भाजप महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा आम्रपाली साळवे व प्रदेश सचिव शिल्पाताई मराठे यांचा महिला मोर्चा संघटन निमित्ताने जिल्हा प्रवास सुरू आहे. दरम्यान त्यांनी आज जिल्हा कार्यालयाला सदिच्छा भेट देत महिला मोर्चा रचनेच्या अनुषंगाने चर्चा केली. यावेळी जिल्हा कार्यालयात जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी बोलताना प्रदेश उपाध्यक्षा आम्रपाली साळवे म्हणाल्या की, महिला आरक्षणाचा अनेक वर्षे प्रलंबित असलेला विषय मोदी सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलवून मार्गी लावला. संसदेच्या दोन्ही सभागृहांनी उच्चांकी बहुमताने महिला आरक्षण विधेयकाला मंजुरी दिली . भारताच्या विकास यात्रेत महिला शक्तीचा वाटा निर्णायक असणार आहे, हे ओळखून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महिला आरक्षणाचे विधेयक संसदेत मंजूर करण्यासाठी आवश्यक असणारी राजकीय इच्छाशक्ती दाखवली. महिला आरक्षण विधेयकाचे कायद्यात रूपांतर करून मोदी सरकारने समस्त महीला भगिनींचा सन्मान केला आहे. मोदी सरकारने 2014 ते 2023 या काळात महिला वर्गांसाठी अनेक योजना सुरू केल्या ज्या स्वातंत्र्य प्राप्तीनंतर कोणत्याही सरकारकडून अंमलात आणल्या गेल्या नव्हत्या, त्यामुळे भाजपाच्या महिला कार्यकर्ता भगिनींनी या देशप्रेमी कार्यात थोडा अधिकचा वेळ देऊन काम करण्याची गरज आहे, महिलांसाठी सुरु केलेल्या योजनांची माहीती भाजपा महिला कार्यकर्त्यांनी योग्य पद्धतीने महीला वर्गात पोहचवावी असे आवाहन केल. राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड या राज्यातील विजय हा महिला सक्षमीकरणाचा दाखला आहे असेही त्यांनी सांगितले. या प्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष तथा भाजपा जिल्हा मुख्यालय प्रभारी प्रसन्ना देसाई, प्रदेश कार्यकारिणी सदस्या संध्याताई तेरसे, कार्यालय मंत्री समर्थ राणे उपस्थित होते.

error: Content is protected !!