दिड महिन्यापूर्वी पालकमंत्र्यांनी भूमिपूजन केलेल्या चिंदर मधील रस्त्यांची वर्कऑर्डर कधी होणार? – उदय दुखंडे

आचरा (प्रतिनिधी) : महाविकास आघाडी सरकारच्या काळात आमदार वैभव नाईक यांनी केलेल्या मागणीमुळे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेधून चिंदर सडेवाडी माऊली मंदिर ग्रा. मा. ५९ या रस्त्यासाठी २ कोटी ६३ लाख रु. व चिंदर भगवंतगड रस्ता, तेरई जोड रस्ता ग्रा.मा. ५८ या रस्त्यासाठी ६ कोटी १० लाख रु. निधी मंजूर झाला आहे. मात्र आ. वैभव नाईक यांच्या कामाचे श्रेय लाटण्यासाठी कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली नसतानाही मालवण आणि आचऱ्यामधील भाजप पदाधिकाऱ्यांनी बुधवार १ नोव्हेंबर २०२३ रोजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते या दोन्ही कामांची भूमिपूजने केली. या कामांच्या वर्कऑर्डर झाल्या नसताना देखील भाजप पदाधिकऱ्यांनी पालकमंत्र्याना अंधारात ठेवून ही भूमिपूजने केली. मात्र आता दीड महिना होऊन गेला तरी देखील पालकमंत्र्यांनी भूमिपूजन केलेल्या चिंदर मधील कामांना वर्कऑर्डर नसल्याने प्रत्यक्षात सुरुवात करण्यात आलेली नाही.वैधानिक पदावर काम करणाऱ्या पालकमंत्र्यांकडून भाजप पदाधिकारी अशाप्रकारे भूमिपूजने करून घेत जनतेची फसवणूक करत असतील तर पालकमंत्र्यांवर कोण विश्वास ठेवणार? असा सवाल मालवण शिवसेना उपतालुकाप्रमुख उदय दुखंडे यांनी केला आहे. चिंदर मधील कामांच्या वर्कऑर्डर देण्यासाठी शासन स्तरावर व सबंधित विभागाच्या सचिवांकडे आ. वैभव नाईक पाठपुरावा करीत आहेत.लवकरच ही कामे मार्गी लावली जातील असेही उदय दुखंडे यांनी सांगितले.

error: Content is protected !!