वैभववाडी (प्रतिनिधी) : खासदार विनायक राऊत यांच्या वाढत्या लोकप्रियतेची धास्ती आ. नितेश राणे यांनी घेतली आहे. त्याच नैराश्यातून त्यांनी वैभववाडी महोत्सवात खा. राऊतांवर टीका केली. सांस्कृतीक व्यासपीठावर राजकीय भाष्य करून राणेंनी आपले संस्कार यातून दाखवले. शिवसेनेवर यानी कितीही टीका केली तर पुन्हा एकदा खासदार श्री. राऊत हे निवडून येणार आहेत. अडीच लाखाच्या मताधिक्याने ते निवडून येऊन विजयाची हॅटट्रिक पूर्ण करणार असा विश्वास ठाकरे शिवसनेचे नेते अतुल रावराणे यांनी येथे व्यक्त केला.
येथील ठाकरे शिवसेना सपर्क कार्यालयात श्री. रावराणे यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी उपजिल्हाप्रमुख नंदू शिंदे, तालुकाप्रमुख मंगेश लोके, नगरसेवक रणजित तावडे, बडु सावंत, सुनील रावराणे, शिवाजी राणे आदी उपस्थित होते.
श्री. रावराणे म्हणाले सिंधुदुर्ग जिल्हयाला सांस्कृतीक आणि सामाजिक चळवळीचा वारसा आहे. त्याला अनुसरून नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्य रोटरी क्लब आणि नगरपंचायतीने वैभववाडी महोत्सवाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे रितसर निमत्रण खासदार श्री. राऊत यांना रोटरी आणि नगरपंचायतीच्या काही नगरसेवकांनी दिले होते. नेहमी जनतेत असलेल्या खासदार श्री. राऊत हे कार्यक्रमाला उपस्थित राहीले. उपस्थित रसिकांनी त्यांचे कौतुक देखील केले, कार्यक्रमाला आल्यानंतर सांस्कृतीक भान असलेल्या खासदारांनी काहीही राजकीय वक्तव्य केलेले नाही. परंतु खासदारांची वाढती लोकप्रियता आमदार राणेंना सहन झाली नाही. त्यांनी नेहमीप्रमाणे त्यांच्यावर टिका केली, व्यासपीठ नेमके कसले आहे याचे भान देखील त्यांना राहीले नाही. मात्र तालुक्यातील उपस्थित जनतेला मात्र सगळे कळून चुकले आहे. विकासाचा ध्यास घेतलेल्या खासदारांवर विकासकामावरून त्यांनी टिका केली. परंतु खासदार हे प्रामाणिकपणे जनतेचे काम करतात. ते कामांच्या टक्केवारीकरीता काम करीत नाही अशी टिका देखील श्री. रावराणे यांनी केली.
वाभवे वैभववाडी नगरपंचायत पुन्हा एकदा संभाजी चौकाच्या सुशोभिकरणावर २५ लाखांचा निधी खर्च करीत असल्याची माहीती मिळत आहे. परंतु आतापर्यत या चौकावर २३ लाखांचा निधी खर्च झाला आहे. आता पुन्हा २५ लाख याचा अर्थ ४८ लाख रूपये या चौकावर खर्च होणार आहेत. वैभववाडीतील सर्व पायाभूत आणि अत्यावश्यक कामे संपली का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या कामाला आमचे नगरसेवक विरोध करतील असे त्यांनी स्पष्ट केले.
वा राऊत हे जनतेच्या हिताची कामे करतात. खासदारांच्या सोबत केव्हाही ठेकेदारांचि गराडा नसतो. याऊलट आ. राणे हे टक्केवारीसाठी कामे करतात. त्याच्यासोबत नेहमी ठेकेदारांची टोळी असते. त्यांच्यासाठीच ते काम आणतात असा आरोप रावराणे यांनी केला.











