अब की बार चार सौ पार हे मोदींचे स्वप्न साकार करूया
आपल्या गावातील हक्काचा खासदार निवडून द्या
केंद्रीयमंत्री राणेंचे कलमठ विभागाच्या होमपीच वर भावनिक आवाहन
कणकवली (प्रतिनिधी) : मी देशाचा मंत्री असलो तरी गावात साहेब नाही, वरवडे गावचा मी सुपुत्र आहे. लोकसभेला सामोरे जाण्याआधी गावातील वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे . अब की बार चार सौ पार हे मोदींचे स्वप्न साकार करूया. आपल्या गावातील हक्काचा खासदार लोकसभेला निवडून द्या अशा शब्दांत केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांनी कलमठ विभागातील महायुती च्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात भावनिक साद घातली. कलमठ जिल्हा परिषद विभागाचा महायुती कार्यकर्ता संवाद मेळावा कलमठ येथील वृंदावन हॉलमध्ये संपन्न झाला. त्यावेळी मंत्री राणे बोलत होते.पुढे बोलताना राणे म्हणाले की, आजवर मला 10 पदे मिळाली आहेत. मी देशाचा सेवक आहे ही माझी भावना आहे. वरवडे फळसेवाडी चा एक मुलगा राज्यात मुख्यमंत्री देशाचा उद्योगमंत्री झाला. या मातील ताकद आहे. मेहनत करा यश नक्की मिळेल. माझ्यातली माणुसकी कायम ठेव हे एकमेव मागणे नेहमी देवाकडे मागतो. माझे वडील 4 वर्षे बेडवर पडून होते. आई कष्ट करायची. नाईट स्कुल मध्ये जाऊन शिक्षण घेतले. 13 व्या वर्षीपासून मुंबईत उधारीने भांडवल घेऊन लहान सहान व्यवसाय केला. जेव्हा पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो तेव्हा फळसेवाडीत रस्ता वीज पाणी नव्हते. नंतर रस्ते वीज पाणी गावात आणलेच पण मुख्यमंत्री झालो तेव्हा राज्यातील प्रत्येक गावात रस्ते वीज पाणी आणले. आधी व्यवसाय करा नंतर सोबत राजकारण करा. माझ्यासह निलेश नितेश व्यवसाय करतात. आजही दिवसाला 14 तास काम करतो असे सांगत केंद्रीयमंत्री राणे यांनी मेळाव्यात उपस्थित तरुणाई समोर आपला जीवनपट उलगडून सांगीतला. पुढे बोलताना मंत्री राणे म्हणाले की, विकास प्रकल्पांना कोकणात विरोध केला जातो. सी वर्ल्ड प्रकल्पाने सिधुदुर्गं जगाच्या पर्यटन नकाशावर आले असते. दुर्दैवाने त्यालाही विरोध झाला. कोव्हीड काळात बंद पडलेले उद्योग पुनर्जीवित करण्यासाठी 5 लाख कोटी निधी दिला. एम एम एम ई मधून 39 टक्के महिला उद्योजक तयार झाले आहेत.वनौषधीपासून औषधे बनवण्याचे कारखाने आपल्या जिल्ह्यात यावेत यासाठी माझे प्रयत्न आहेत. ओरोस येथे 200 कोटींचे टेक्निकल ट्रेनिंग सुरू केले आहे. दोडामार्ग मध्ये 1 हजार एकर जागेत 500 कारखाने आणण्याचा माझा प्रयत्न आहे. येथे रोजगार हा स्थानिक युवक युवतींना मिळाला पाहिजे हा माझा मानस आहे.
यावेळी व्यासपीठावर आमदार नितेश राणे, कलमठ गावप्रमुख सुनील नाडकर्णी,भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, कणकवली तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, तालुकाध्यक्ष संतोष कानडे, माजी सभापती प्रकाश सावंत, उपतालुकाध्यक्ष सोनू सावंत, आशिये सरपंच महेश गुरव, शिवसेना शहरप्रमुख प्रमोद मसुरकर, कलमठ उपसरपंच स्वप्नील चिंदरकर,माजी पं स सदस्य महेश लाड, पपू पुजारे, सदा चव्हाण आदी उपस्थित होते.













