सुरक्षा रक्षक मंडळातील सुरक्षा रक्षकांना मिळणार खाकी वर्दी

आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांना यश

सुरक्षा रक्षकांनी मानले आमदार वैभव नाईक यांचे आभार

कणकवली (प्रतिनिधी) : सुरक्षा रक्षक मंडळातील सुरक्षा रक्षकांना पोलिसांप्रमाणे खाकी रंगाचा गणवेश देण्याची मागणी आमदार वैभव नाईक यांनी हिवाळी अधिवेशनात केली होती. त्या मागणीची पूर्तता महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाने केली आहे. कामगार विभागाच्या अखत्यारीत असणाऱ्या सुरक्षा रक्षक मंडळातील सुरक्षा रक्षकांचा गणवेश खाकी रंगाचा ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यास अनुसरुन सुरक्षा रक्षकांच्या टोपीचा रंग निळा व त्यावर सुरक्षा रक्षक मंडळाचा लोगो व नाव चिन्हांकित करण्यात यावे. तसेच बेल्ट व बुट काळ्या रंगाचे असावेत असे आदेश महाराष्ट्र शासन कामगार विभागाचे अवर सचिव दिलीप वणिरे यांनी कामगार आयुक्त व सहआयुक्त (माथाडी) कामगार मुंबई यांना दिनांक ०१/१०/२०२४ रोजी काढले आहेत.

नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात आमदार वैभव नाईक यांनी सुरक्षा रक्षकांचा प्रश्न उपस्थित केला होता.ते म्हणाले होते की, सुरक्षा रक्षक मंडळ महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये असून त्यामाध्यमातून स्थानिक तरुणांना सुरक्षा रक्षक पदावर नेमून रोजगार देऊन एमआयडीसी, हॉस्पिटल, वीजवितरण आदी ठिकाणी नेमले जातात. परंतु शासनाने इतर सुरक्षा बले काढल्याने सुरक्षा रक्षक मंडळांतील सुरक्षा रक्षकांचे महत्व कमी होत आहे. याकडे शासनाचे लक्ष वेधत सुरक्षा रक्षकांना कायमस्वरूपी करण्याबरोबर त्यांना पोलिसांप्रमाणे खाकी रंगाचा गणवेश देण्याची मागणी आमदार वैभव नाईक यांनी विधानसभेत लावून धरली होती. व त्याबाबत वेळोवेळी शासनाजवळ पाठपुरावा केला होता. आमदार वैभव नाईक यांच्या मागणीला यश आले असून शासनाकडून सुरक्षा रक्षक मंडळातील सुरक्षारक्षकांना खाकी वर्दी मंजूर करण्यात आली.खाकी वर्दी मिळण्याची बऱ्याच वर्षापासून सुरक्षारक्षकांची असलेली मागणी पूर्ण केल्याबद्दल आमदार वैभव नाईक यांचे सुरक्षारक्षकांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!