वेंगुर्ला (प्रतिनिधी) : समाजातील खोलवर रुजलेल्या नरबळी, अनिष्ट ,अघोरी प्रथा, रुढी परंपरा आणि जादूटोणा यामुळे सर्वसामान्य जनतेच्या मनात खोलवर अंधश्रद्धेचा अंधार दाटून आला आहे. हा अंधश्रद्धेचा अंधार दूर करण्यासाठी तरुणांनी पणतीची भूमिका वटवावी, असे आवाहन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक विजय चौकेकर यांनी केले.
कोकण एज्युकेशन सोसायटीच्या लोकनेते ऍड. दत्ता पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमध्ये आयोजित केलेल्या महाविद्यालय व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, विद्यार्थी कल्याण विभाग, बहि:शाल शिक्षण मंडळ कार्यक्रमात केले. यावेळी त्यांच्या समवेत विचारमंचावर कॉलेजचे प्राचार्य डॉ. के. जी. केळकर, उपप्राचार्य मनोज आरोस्कर, अभाअंनिस समितीचे उपाध्यक्ष व बहि:शाल शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. संजिव लिंगवत, अभाअंनिसचे सदस्य चंद्रकांत म्हापणकर आदी उपस्थित होते .

विजय चौकेकर आपल्या भाषणात पुढे म्हणाले, की समाजाचे स्वास्थ्य चांगले राहावे आणि जादूटोणा करणाऱ्या भोंदू लोकांपासून लोकांचे संरक्षण व्हावे यासाठी महाराष्ट्र शासनाने जादूटोणा विरोधी कायदा केला. हा जादूटोणा विरोधी कायदा आपण सर्वांनी समजून घ्यावा आणि जादूटोणा कायदा समजून घेऊन जीवनात त्याचा अवलंब करावा आणि पणती ज्या प्रमाणे आपल्या परीने रात्रीचा आपल्या घरातील अंधार दूर करण्याचा प्रयत्न करते त्या प्रमाणे प्रत्येक तरुण तरुणींनी जनतेच्या मनामनातील अंधश्रद्धेचा अंधार दूर करण्यासाठी पणतीची भूमिका वटवावी असे आवाहन केले .
यावेळी डॉ . प्राचार्य के . जी . केळकर सरांनी विद्यार्थ्यांना जीवनात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी गरज का आहे ? घडणाऱ्या प्रत्येक घटनेमागील कार्यकारणभाव जाणून घेणे म्हणजेच वैज्ञानिक दृष्टिकोन आचरणे हे समजावून दिले .
तर डॉ . संजिव लिंगवत यांनी महिलांमधील मॅनिया, सिझोफेनिया , हिस्टेरिया इ. आजार आणि त्याबाबतची अंधश्रद्धा या विषयी सविस्तर माहिती दिली .
यावेळी विजय चौकेकर यांनी जादूटोणा करणारे भोंदू लोक जी विविध प्रात्यक्षिक व हातचलाखी करून आपणास सिद्धी प्राप्त असल्याचा दावा करतात अशी विविध प्रात्यक्षिके मूलांना करून दाखविली . त्यांच्याकडून करून घेऊन त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला . कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. संजीव लिंगवत सरांनी केले , स्वागत डॉ. सतिश पाटील यांनी तर आभारप्रदर्शन डॉ. दिपाली देसाई यांनी केले. कार्यक्रमाला शिक्षक व विद्यार्थी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होता .











