सुमारे ३ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे अंदाज
वीज ग्राहकांना त्यांच्या नुकसानाची भरपाई तत्काळ द्यावी – रमाकांत राऊत
खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण गावातील जैनवाडी, कपिलेश्वरवाडी, भैरीआळी आदी भागातील वीज ग्रहकांचा घरघुती वीज पुरवठ्या मध्ये अचानक उच्च विद्युत दाब निर्माण झाल्यामुळे येथील नागरिकांच्या घरातील दैनंदिन वापरातील विद्युत उपकरणांचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाले आहे. सदर बाब गंभीर असून नुकसान ग्रस्त ग्राहकांचे तातडीने पंचनामे करून त्यांच्या झालेल्या नुकसानाची भरपाई महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाने तबोडतोब द्यावी.अशी मागणी खारेपाटण गावचे माजी सरपंच व भाजप पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते रमाकांत राऊत यांनी लेखी निवेदनाद्वारे वीज मंडळाकडे केली आहे.
याबाबत तातडीने खारेपाटण येथील विद्युत सहायक अभियंता खोत यांची रमाकांत राऊत यांनी कार्यालयात भेट घेऊन लेखी निवेदन गमदेऊन त्यांच्या ही बाब निदर्शनास आणून दिली. सदर घटना दी.६ जुलै २०२५ रोजी दुपारी १२.३० च्या दरम्यान घडली असून अचानक वाढलेल्या अती उच्च विद्युत दाब प्रवाहामुळे घरातील फक्त विद्युत उपकरणांचे नुकसान झाले आहे. मात्र यामुळे एखादी जीवित हानी झाली असल्यास त्याला जबाबदार कोण ? असा संतप्त सवाल देखील यावेळी रमाकांत राऊत यांनी व्यक्त केला.
दरम्यान अती उच्च दाब प्रवाहामुळे खारेपाटण येथील ज्या ग्राहकांचे नुकसान झाले आहे. त्यांची नावे पुढील प्रमाणे श्री प्रमोद शांताराम मोहीरे, अरविंद दामोदर कर्ले, पार्श्व एच. पी. गॅस एजन्सी कार्यालय, मनोहर बंडू तेली, दीपक अंकुश शेट्ये, विजय जयराम देसाई, सुयोग सुरेश ब्रम्हदंडे, रवींद्र गणपत ब्रम्हदंडे, राकेश रमाकांत राऊत, श्रीकृष्ण शांताराम राऊत, संकेत सुरेश गुरव या सर्व ग्रहकांचे मिळून सुमारे ३ लाख रुपये एवढे नुकसान झाले असून उच्च दाब नियंत्रित करणे ही महावितरण विभागाची जबाबदारी असून यामध्ये आमची काहीच चूक नसताना आम्हाला नाहक नुकसान सहन करावे लागत असल्याचे वीज ग्राहकांचे म्हणणे आहे.
खारेपाटण येथे घडलेल्या या घटनेमुळे वीज ग्राहकांच्या घरगुती वापरात येणाऱ्या ट्यूब लाईट, बल्ब, पंखे, फ्रिज, कुलर, मोटार टिव्ही, मिक्सर, इस्त्री, लॅपटॉप इत्यादी उपकरण वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अचानक वाढलेल्या अती उच्च दाब वीज प्रवाहामुळे निकामी झालेल्या घरघुती वीज उपकरणाचा मानसिक व आर्थिक त्रास वीज ग्रहकाना सहन करावा लागत आहे.
याबाबत रमाकांत राऊत यांनी महावितरण कार्यालयाशी संपर्क साधला असता. विद्युत निरीक्षक हे नुकसानीचे पंचयादी घालण्यासाठी उपलब्ध नसल्याचे समजते. दरम्यान ही बाब गंभीर असून माणसे मेल्यानंतरच वीज मंडळाचे अधिकारी घटनास्थळी पोहचणार का ? असा सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे. खारेपाटण येथील वीज ग्राहकांचे वीज मंडळाच्या बेपर्वाई मुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करून त्यांना झालेल्या नुकसानाची भरपाई न दिल्यास खारेपाटण ग्रामस्थांच्या वतीने महावितरण कंपनी च्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा रमाकांत रमाकांत राऊत यांनी दिला आहे.










