निवृत्त उपजिल्हाधिकारी सुरेश सखाराम कदम यांचे दुःखद निधन

देवगड (प्रतिनिधी) : शिरवली, ता. देवगड गावचे सुपुत्र सुरेश कदम यांचे अल्पशा आजाराने येथील खाजगी रुग्णालयात आज दिनांक १५ ऑगस्ट रोजी दुःखद निधन झाले. एक कर्तव्यदक्ष अधिकारी, उत्तम प्रशासक आणि सर्वांशी आपुलकीने वागणारे प्रेमळ माणूस म्हणून त्यांची ओळख होती. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत त्यांनी महसूल खात्यात नोकरी करत मंडल अधिकारी, तहसीलदार ते उपजिल्हाधिकारी अशा महत्वांची पदांवर काम करत त्यांनी आपल्या पारदर्शी प्रशासनाचा ठसा उमटविला. प्रशासकीय सेवेबरोबरच त्यांचे सामाजिक चळवळीतही योगदान होते. बौध्द विकास सेवा संघ शिरवली मंडळाचे सल्लागार म्हणून तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक सामाजिक संघटनांमध्ये ही त्यांचा वावर होता.

सुरेश कदम यांनी शिरवली, ता. देवगड सारख्या दुर्गम भागात आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण करून पुढील शिक्षण नांरिग्रे येथे पूर्ण केले. त्यानंतर देवगड तहसील कार्यालयात लिपिक पदावर रुजू झाले. त्यानंतर वेंगुर्ला नगरपरिषद येथे मुख्याधिकारी, देवगड येथे नायब तहसीलदार, राजापूर येथे तहसीलदार, तसेच भंडारा येथून उपजिल्हाधिकारी या पदावरून ते सेवानिवृत्त झाले होते. एक शिस्त प्रिय अधिकारी म्हणून त्यांची प्रशासनामध्ये ओळख होती. त्यांच्या पारदर्शी आणि उत्तम प्रशासनाची दखल घेऊन त्यांना तत्कालीन शासनाच्या वतीने आदर्श प्रशासकीय अधिकारी म्हणूनही गौरविण्यात आले होते. नोकरी बरोबरच सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचे मोठे योगदान होते. त्यांच्या जाण्याने सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील एक आधारस्तंभ हरपला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, भाऊ, बहिणी असा परिवार आहे. उद्या १६ ऑगस्ट, २०२५ सकाळी १०.३० वाजता त्यांच्या पार्थिवावर शिरवली, ता. देवगड येथे त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

error: Content is protected !!