वैभववाडी (प्रतिनिधी) : देशाची भावी पिढी घडविण्याची जबादारी ही शिक्षकांची आहे.जेष्ठ शिक्षकांच्या योगदानातूनच अनेक विदयार्थी घडले असून ते विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यामुळे या गुरूंचे उपकार विसरता येणार नाहीत. असे भावनिक उद्गार माजी वित्त व बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे यांनी काढले.
महाराष्ट्र राज्य सेवानीवृत्त शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व अधिकारी संघटना शाखा वैभववाडी यांच्यावतीने सेवानिवृत्त कर्मचारी मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सखाराम देसाई उपस्थित होते. यावेळी माजी वित्त बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे, माजी सभापती बाप्पी मांजरेकर, संघटनेचे जिल्हाध्यक्ष शरद नारकर, सचिव नितीन जठार, राज्य उपाध्यक्ष गुंडू चव्हाण, संतोष कदम, प्रकाश साळुंखे व सेवानिवृत्त शिक्षक अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सखाराम देसाई म्हणाले, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी एकजुटीने राहिले पाहिजे. तुम्ही संघटित राहिलात तर तुमच्या समस्या जलदगतीने सुटू शकतात. बाप्पी मांजरेकर म्हणाले, शिक्षकांनी आम्हाला घडविले आहे. त्यांनी आमच्यामध्ये चांगले संस्कार रुजविले. ती संस्काराची शिदोरी पाठीशी बाळगून आम्ही मार्गक्रमण करत आहोत असे सांगितले. शरद नारकर, नितीन जठार, संतोष कदम,श्री चव्हाण,प्रकाश साळुंखे यांनी मनोगत व्यक्त केले. निवृत्त शिक्षकांचा पुष्पगुच्छ, शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी रामचंद्र आडुळकर, श्रीधर रावराणे, मधुसूदन कदम, सुप्रिया परब, पुनम कदम, अरुण पंडित, रघुनाथ बोभाटे, नाना तांबे, मनोहर साटम व शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाला विशेष सहकार्य उद्योजक सुनील सदानंद नारकर यांचे लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब कोलते, तर आभार सुहास रावराणे यांनी मानले.












