बारसू रिफायनरीविषयी संवेदनशील रीतीने मार्ग काढण्याचे आवाहन
रत्नागिरी (प्रतिनिधी) : बारसू मधील रिफायनरीविरोधात चालू असलेल्या आंदोलनाला आता उग्र रूप येऊ लागले आहे. याविषयी बोलताना बारसू मधील रिफायनरी सर्वेक्षण त्वरित स्थगित करा. पोलिसी बळाचा वापर करून दंडुकेशाहीने सर्वे नको, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारकडे केली आहे. रिफायनरीविषयी संवेदनशील रीतीने मार्ग काढावा. चर्चा करावी, असेही त्यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून अनेक वेळा आंदोलनं झाली. मात्र, त्यावेळी चर्चा होऊन त्यावर योग्य मार्ग काढण्यात आला. त्यामुळे याही बाबतीत चर्चा करून मार्ग निघू शकतो. आंदोलनकर्त्यांची नेमकी भूमिका काय आहे हे समजून घेऊन त्यांच्या शंकेचं निरसन केलं पाहिजे. राष्ट्रवादीची भूमिका विकासाची आहे. परंतु विकास करत असताना कोणत्याही प्रकारे पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही, भावी पिढीचं नुकसान होणार नाही, पर्यटनावर त्याचा विपरीत परिणाम होणार नाही याची काळजी घ्यावी, असे त्यांनज म्हटले आहे.












