मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेला मूर्तस्वरूप; पर्यटन, रोजगार आणि कृषी क्षेत्राला मिळणार मोठी चालना
तिकीट बुकिंगच्या माध्यमातून रो-रो सेवेला मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद
सुरक्षेच्या दृष्टीने सर्व परवानग्या प्राप्त;बोटीत आरोग्य सुविधा असणार उपलब्ध
मुंबई (प्रतिनिधी) : जलवाहतूक (रो-रो) सेवा सुरू करणे, ही संकल्पना मुळातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आहे. त्या संकल्पनेतूनच मुंबई आणि कोकणाला जलवाहतुकीच्या माध्यमातून जोडणे हा उपक्रम सुरू करत आहोत. मुख्यमंत्र्यांच्या या संकल्पनेला खऱ्या अर्थाने १ मार्च पासून सुरुवात होत आहे. भाऊचा धक्का ते विजयदुर्ग असा पहिला टप्पा मुंबई आणि कोकणाला जोडण्याच्या दृष्टिकोनातून सुरू करत आहोत, अशी माहिती मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी विधिमंडळात पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी बोलताना मंत्री नितेश राणे यांनी सांगितले, मुंबई ते विजयदुर्ग हा पहिला जलमार्ग रो-रो सेवेचा असेल. येणाऱ्या काळात मुंबई ते रत्नागिरी, मुंबई ते महाड असे वेगवेगळे जल मार्ग यामध्ये सुरू केले जाणार आहेत, असे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले. या बोट सेवेची संपूर्ण माहिती आणि तिकीटचे दर काय आहेत, याची संपूर्ण माहिती वेबसाईटवर उपलब्ध आहे. तिकीट बुकिंग देखील मोठ्या प्रमाणावर सुरू झालेले आहे. चांगला प्रतिसाद या तिकीट बुकिंगच्या माध्यमातून रो-रो सेवेला मिळत आहे.
कोकणात शिमगोत्सव सुरू होणार आहे. या शिमगोत्सवाला कोकणात जाण्यासाठी, सिंधुदुर्ग कोकणची जनता मोठ्या प्रमाणात सकारात्मक पद्धतीने प्रतिसाद देत आहे. हे तिकीट बुकिंगच्या माध्यमातून दिसत आहे. अशा पद्धतीचे प्रयत्न रो-रो सेवेच्या माध्यमातून मुंबई कोकण किंबहुना मुंबईला अन्य राज्यांबरोबर जोडण्याचे काम आणि पर्यटन, रोजगार आणि कृषी क्षेत्राला चालना देण्याचे काम या जलवाहतुकीच्या माध्यमातून होणार आहे.
पर्यटनाच्या दृष्टिकोनातून सुद्धा विचार आपण करत आहोत. कोकणात जाण्यासाठी जेव्हा साडेचार ते पाच तासात कोकणात जाऊ शकू तेव्हा आपला जास्तीत जास्त वेळ वाचू शकतो. आंबा, काजू, मच्छीमारी व्यवसायाला देखील मोठ्या प्रमाणावर चालना मिळेल. पर्यटन आणि रोजगाराला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन मिळणार. रो-रो सेवा संदर्भात सुरक्षिततेच्या सर्व परवानगी मिळाल्यानंतरच काही ट्रायल केल्यानंतर हि सेवा सुरू करत आहोत. १ मार्चपासून प्रवासी तिथे जायला सुरुवात करतील. आपण त्या बोटीवर काही डॉक्टर सुद्धा उपलब्ध करून देणार आहोत. जेणेकरून काही लोकांना समुद्र प्रवासाचा होणारा त्रास झाल्यास उपचार मिळेल. पर्यावरण पूरक विकास हाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा हेतू आहे, असे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.











