आढावा बैठकीत मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे निर्देश
मुंबई (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग, आचरा, निवती, वेंगुर्ला, मालवण आणि देवगड पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील समुद्र किनारी राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या कामास तातडीने गती देण्याचे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी आज दिले.
मंत्रालयात याबाबत पार पडलेल्या आढावा बैठकीत आयटी विभागाचे विरेंद्र सिंग तसेच सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व्हिडिओ कॉन्फरेन्सिंगद्वारे उपस्थित होते. या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्रकिनारी भागांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) युक्त सीसीटीव्ही सर्व्हेलन्स प्रणाली उभारण्याच्या प्रस्तावाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. राष्ट्रीय सुरक्षेच्या अनुषंगाने महाराष्ट्र सागरी मंडळाच्या माध्यमातून हा प्रकल्प राबविण्यात येणार असून, त्यासाठी आवश्यक असलेल्या प्रशासकीय व तांत्रिक मंजुरीच्या प्रक्रियांना विलंब न लावता पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेश मंत्री राणे यांनी दिले.
मंत्री राणे यांनी सांगितले की, सिंधुदुर्ग जिल्ह्याची भौगोलिक स्थिती आणि विस्तीर्ण किनारपट्टी लक्षात घेता आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे सुरक्षेची भक्कम यंत्रणा उभारणे अत्यावश्यक आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे बेकायदेशीर हालचालींवर नियंत्रण ठेवणे, सागरी गुन्ह्यांना आळा घालणे तसेच आपत्कालीन परिस्थितीत त्वरित प्रतिसाद देणे शक्य होणार आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग किनारपट्टीच्या सुरक्षेसाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा असून, कोणतीही दिरंगाई न करता काम तातडीने सुरू करण्याचे निर्देश मंत्री राणे यांनी बैठकीत दिले.














