१ लाख ७५ हजारांहून अधिक वीज ग्राहकांचा एल्गार ; कणकवलीत महावितरण अधिकाऱ्यांना धारेवर धरणार
कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाढत्या वीज समस्यांमुळे संतप्त झालेल्या वीज ग्राहकांनी आता थेट महावितरण अधिकाऱ्यांनाच जाब विचारण्याचा निर्धार केला असून, सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना, कणकवली तालुका व्यापारी संघटना आणि कणकवली तालुका वीज ग्राहक संघटना यांच्या संयुक्त पुढाकारातून उद्या शुक्रवार दिनांक २९ मे २०२६ रोजी दुपारी ३ ते ५ या वेळेत महावितरण कार्यकारी अभियंता, कणकवली यांच्या केबिनमध्ये “गरमागरम चाय पे चर्चा” हा अभिनव पण तितकाच आक्रमक उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. मालवण, देवगड, वैभववाडी आणि कणकवली तालुक्यातील तब्बल १ लाख ७५ हजारांहून अधिक अन्यायग्रस्त वीज ग्राहकांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येणार असून, आगामी पावसाळ्यात दर्जेदार, सुरळीत आणि २४ तास अखंडित वीज पुरवठा मिळावा यासाठी थेट अधिकाऱ्यांशी चर्चा करत नागरिक आपल्या संतप्त भावना व्यक्त करणार आहेत.
महावितरण कंपनीकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गरीब व सर्वसामान्य वीज ग्राहकांची सातत्याने आर्थिक लूट सुरू असल्याचा गंभीर आरोप संघटनांनी केला आहे. मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीची कामे अर्धवट ठेवण्यात आल्याने येणाऱ्या पावसाळी आणि सणासुदीच्या कालावधीत पुन्हा मोठ्या प्रमाणात वीज खंडित होण्याची भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. महावितरण अधिकाऱ्यांचा निष्क्रिय, गलथान आणि बेजबाबदार कारभार यामुळे प्रामाणिक वीज ग्राहकांना अंधारात रात्र काढण्याची वेळ येऊ नये, यासाठीच हा एल्गार पुकारण्यात आल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले. या चर्चेसाठी चारही तालुक्यातील पीडित वीज ग्राहक, व्यापारी, उद्योजक, व्यावसायिक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगराध्यक्ष, नगरसेवक, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संजय लाड, ॲड. नंदन वेंगुर्लेकर, संतोष नाईक, दीपक बेलवलकर, दादा कुलकर्णी, साईनाथ आंबेरकर आणि मनोज घाटकर यांनी केले आहे. “चहाचा झुरका घेत घेत आता महावितरणच्या कारभाराचा हिशोब मागितला जाणार असून, ग्राहकांच्या संयमाचा अंत झाला आहे” अशी संतप्त प्रतिक्रिया देखील नागरिकांमधून व्यक्त होत आहे.












