वैभववाडीतील खांबाळे गावच्या सुपुत्राची मराठी चित्रपटसृष्टीतील मानाच्या पदावर निवड; कोकणात आनंदाचे वातावरण
वैभववाडी (प्रतिनिधी) : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या पंचवार्षिक निवडणूक २०२६ मध्ये दिग्दर्शक प्रवर्गातून दिग्दर्शक दीपक दत्ताराम कदम यांनी दणदणीत विजय संपादन करत संचालकपदी निवड होण्याचा बहुमान मिळवला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय विजयामुळे मराठी चित्रपटसृष्टीत तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खांबाळे (ता. वैभववाडी) या ग्रामीण भागातील मातीतून आलेल्या दीपक कदम यांनी आपल्या मेहनती, चिकाटी आणि कलात्मक दृष्टिकोनाच्या जोरावर मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. अत्यंत साध्या कुटुंबातून प्रवास सुरू करत त्यांनी आपल्या मेहनतीच्या बळावर दिग्दर्शक, लेखक आणि निर्माता म्हणून स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे.
दीपक कदम यांनी आजवर विविध सामाजिक, कौटुंबिक, वास्तववादी तसेच मनोरंजनप्रधान विषय हाताळत २० हून अधिक चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. त्यांच्या चित्रपटांमध्ये समाजातील विविध प्रश्न, सामान्य माणसांच्या भावना, संघर्ष, नातेसंबंध आणि सामाजिक वास्तव यांचे प्रभावी चित्रण दिसून येते. त्यामुळे त्यांची ओळख केवळ दिग्दर्शक म्हणून नाही तर समाजमनाचा वेध घेणारा संवेदनशील चित्रपटकार अशी निर्माण झाली आहे.
चित्रपट क्षेत्रातील योगदानाबरोबरच सामाजिक क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे. समाजातील वंचित, उपेक्षित घटकांसाठी सातत्याने काम करत समाजजीवनाची जाणीव जपणाऱ्या दीपक कदम यांना राज्यस्तरीय प्रतिष्ठेचा ‘दलित मित्र’ पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले आहे. त्यांच्या सामाजिक बांधिलकीमुळे विविध क्षेत्रांत त्यांच्याबद्दल आदराची भावना व्यक्त केली जाते.
यंदाच्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत त्यांनी समर्थ पॅनलचे प्रमुख श्री मेघराज राजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली. दिग्दर्शक प्रवर्गात एकूण ८ प्रतिस्पर्धी उमेदवार मैदानात असतानाही दीपक कदम यांनी आपला प्रभाव आणि सभासदांमधील विश्वास सिद्ध करत दणदणीत विजय मिळवला. त्यांच्या विजयामागे चित्रपटसृष्टीतील सहकाऱ्यांचे प्रेम, मित्रपरिवाराची साथ आणि सर्वसामान्य सभासदांचा विश्वास असल्याचे बोलले जात आहे.
विशेष म्हणजे, मराठी चित्रपटसृष्टीतील सुमारे ६५ हजार सभासद असलेल्या प्रतिष्ठित अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळासारख्या मोठ्या संस्थेच्या संचालकपदी, कोकणातील ग्रामीण भागातून आलेल्या व्यक्तीची निवड होणे ही केवळ वैयक्तिक उपलब्धी नसून संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा, कोकण आणि ग्रामीण भागासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे. त्यांच्या विजयामुळे ग्रामीण भागातील तरुण कलाकार, दिग्दर्शक आणि चित्रपटकर्मींना नवी प्रेरणा मिळेल, अशी भावना व्यक्त होत आहे.
दीपक कदम यांच्या विजयाबद्दल मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर, कलाकार, दिग्दर्शक, निर्माते, तंत्रज्ञ, मित्रपरिवार तसेच चाहत्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आगामी काळात महामंडळाच्या माध्यमातून चित्रपटसृष्टीतील प्रश्न सोडविणे, नवोदितांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि मराठी चित्रपट क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी ते सक्रिय भूमिका बजावतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
दीपक कदम यांच्या या दणदणीत विजयामुळे “ग्रामीण भागातून आलेला कलावंतही आपल्या मेहनतीच्या बळावर मोठ्या व्यासपीठावर यश मिळवू शकतो” याची पुन्हा एकदा प्रचिती आल्याची भावना कोकणवासीयांकडून व्यक्त होत आहे.












