सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : गतवर्षी डेंग्यू साथीचे जानेवारी ते जुलै पर्यंत १४३ रुग्ण मिळाले होते. यावर्षी या कालावधीत ४३ रुग्ण मिळाले असून एक मृत्यू आहे. यावर्षी रुग्ण कमी मिळाले असले तरी खबरदारी म्हणून आरोग्य विभागाच्यावतीने विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. आशा सेविकांपासून आरोग्य सहाय्यक, समुदाय आरोग्य अधिकारी यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच यंत्रणे मार्फत जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कंटेनर आणि तापाचा सर्व्हे करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा हिवताप अधिकारी डॉ रमेश कर्तसकर यांनी दिली.
यावेळी पुढे बोलताना डॉ कर्तसकर यांनी जानेवारी २०२३ पासून आतापर्यंत जिल्ह्यात डेंग्यू आजाराचे ४३ रुग्ण मिळाले आहेत. यात वैभववाडी तालुका वगळता अन्य सात तालुक्यांत हे रुग्ण मिळाले आहेत. एकूण १८ गावांत हे रुग्ण मिळाले असून कुडाळ तालुक्यातील कसाल प्राथमिक आरोग्य केंद्र, बांदा प्राथमिक आरोग्य केंद्र आणि कळसुली प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत जास्त रुग्ण मिळाले आहेत. कसाल अंतर्गत १४ रुग्ण मिळाले आहेत. तसेच बांदा अंतर्गत दोन रुग्ण मिळाले होते. त्यातील एकाचा मृत्यू झाला आहे. या दोन्ही ठिकाणची साथ पूर्णपणे आटोक्यात आली आहे. तर कळसुली अंतर्गत शिरवल गावांत चार रुग्ण मिळाले आहेत. येथील चार वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. सध्या हा मृत्यू तापामुळे झाल्याचे निदान करण्यात आले असून उपसंचालक स्तरावर हा मृत्यू डेंग्यू आजाराने झाला आहे का ? याची शहानिशा सुरू असल्याचे यावेळी डॉ कर्तसकर म्हणाले.
तसेच जानेवारी २०२३ पासून आतापर्यंत मलेरियाचे १० रुग्ण मिळाले आहेत. मात्र, हे रुग्ण मुंबई, गोवा, काश्मीर अशा अन्य शहरातून आलेले आहेत. त्यामुळे यात स्थानिक रुग्णाचा समावेश नाही. मात्र, हे सर्व रुग्ण बरे झाल्याचे असे डॉ कर्तसकर म्हणाले. त्याच बरोबर जानेवारी २०२३ पासून माकडतापाचे दोन रुग्ण मिळाले असून ते बरे झाले असल्याचे त्यांनी सांगितले.