देवगड (प्रतिनिधी): कै प्रसाद परशुराम लोके, यांच्या क्रुर हत्येच्या निषेधार्थ व सौ मनवा प्रसाद लोके हिला आत्महत्येस प्रवृत्त करण्या-या नराधमांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, प्रसाद व मनवा हिला न्याय मिळालाच पाहिजे, या घटनेच्या निषेधार्थ मिठबाव येथील ग्रामस्थांनी निषेध मोर्चाचे आयोजन देवगड पंचायत समिती ते तहसीलदार कार्यालय देवगड व पोलीस स्थानक देवगड या मार्गावर काढण्यात आला. या मोर्चात महिला पुरुष मिठबाव ग्रामस्थ सहभागी झाले होते.. रामेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा सरपंच भाई नरे यांच्या नेतृत्वाखाली प्रसाद लोकेचे वडील तात्या लोके व अन्य पदाधिकारी सदस्य सहभागी झाले होते. मुणगे (मशवी) येथे प्रसाद लोके यांच्या झालेल्या हत्येप्रकरणी व प्रसाद यांची पत्नी मनवा लोके यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या नराधमास जन्मठेप व्हावी, या निषेधार्थ मिठबाव ग्रामस्थांनी आज धडक मोर्चा देवगड पोलीस स्टेशनकडे नेला होता. यावेळी देवगड पोलीस स्टेशन व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. तसेच झालेल्या निर्घुण हत्येबाबत उपविभागीय पोलिस अधिकारी किशोर सावंत,पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे , देवगड तहसीलदार रमेश पवार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी माजी आमदार अँड अजित गोगटे, भाजप जिल्हा पदाधिकारी जिल्हा संतोष किंजवडेकर, बाळ खडपे,संदीप साटम अजित कांबळे, मिठबावं सरपंच महादेव उर्फ भाई नरे, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष पंडित पारकर, शैलेश लोके, पोलीस पाटील जयवंत मिठबावकर, श्याम कदम, मिठबाव व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रकाश कदम, प्रसाद नाडकर्णी, विनोद लोके, देवेंद्रनाथ जेठे, दिनेश फाटक, श्याम लोके,डॉ मनोज सारंग यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निवेदनात समस्त मिठबावं ग्रामस्थ या प्रमुख मागण्या नमूद केल्या आहेत.मौजे मिठबाव आडारींवाडी येथील रहिवाशी आपले सरकार केंद्राचे चालक श्री. प्रसाद परशुराम लोके यांची दि.१८ सप्टेंबर २०२३ रोजी पहाटेच्या वेळी मुणगे (मशवी) ह्या ठिकाणी निर्घुण हत्या करण्यात आली व त्याच आघाताने त्यांची पत्नी कै. सौ. मनवा प्रसाद लोके हिची आत्महत्या प्रकरणी संबंधितांवर कठोरात कठोर कारवाई करावी असे निवेदन देत. सदर गुन्हाचा तपास सीआयीकडे वर्ग करावा अशी मागणीही यावेळी माजी आमदार अँड अजित गोगटे, प्रसादचे वडील तात्या लोके यांनी केली आहे.या आहेत जाहीर निवेदनातील प्रमुख मागण्या
१. घडलेल्या प्रकारात अटक झालेला आरोपी किशोर पवार याचेसह अन्य किती व कोण इसम सहभागी होते याबाबतचा तपास केला आहे का ? तपास केला असल्यास किती लोकांना अटक करण्यात आली आहे.
२. आरोपीच्या डोक्यावर वजनदार व धारदार अशा दोन प्रकाराच्या हत्याराने घाव घातल्याचे दिसून येत होते त्यापैकी एकूण किती हत्यारे पोलिसांनी जप्त केली आहेत.
३. प्रसाद लोके याचा आरोपी घेवून गेलेला मोबाईल व इतर सर्व गोष्टी सापडल्या आहे का?
४. आरोपी किशोर पवार याच्या मोबाईलवर घटनेपूर्वी ६ तासापर्यंत कोणा-कोणाचे कॉल आले होते व कोणा-कोणाला कॉल
केले होते याचे तपशील तपासून सबंधित व्यक्ती घटनेच्या वेळेला कोठे होत्या त्याची माहिती घेतली का ?
५. परिस्थितीजन्य पुराव्याच्या खटल्यामध्ये गुन्ह्याचा उद्देश सर्वांत महत्वाचा असतो तो शोधला गेला आहे का? व त्याबाबतचे पुरावे सापडले आहेत का?
६. आरोपीच्या गाडीवर अन्य किती लोकांचे हाताचे ठसे मिळाले आहेत ?
७. प्रसाद याला कॉल केल्यानंतर आरोपीने अन्य कोणत्या व्यक्तींसोबत बोलणे केले आहे का?
८. आरोपी पवार याचेवर सौ. मनवा प्रसाद लोके हिला आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी स्वतंत्र गुन्हा भा. दं. वि. कलम ३०६ अंतर्गत दाखल करण्यात यावा.
९. आरोपी पवार याच्या कुटुंबियांकडून किंवा मित्रमंडळींकडून भविष्यात लोके कुटुंबातील पर्शुराम पांडुरंग लोके, सुहासिनी पर्शुराम लोके, चिन्मय पर्शुराम लोके यांची हत्या केली जावू शकते किंवा दबाव आणला जावू शकतो. सबब सबंधित कुटुंबाला पोलीस संरक्षण पुरवण्यात यावे.
वरील निवेदनाचा गांभीर्यपूर्वक विचार करून पोलिस प्रशासनाने ह्या दोन्ही विषयी सखोल तपास करावा. व कुटुंबियांना न्याय द्यावा. सोबत मिठबाव ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील ग्रामस्थ, महिला ,व्यापारी वर्ग व तरुण तरुणाई यांच्या तीव्र भावना सहयांच्या माध्यमातून व्यक्त करीत आहोत.
अशा आशयाचे निवेदन मिठबाव सरपंच तसेच सर्व ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आले.











