बांदा (प्रतिनिधी) : आषाढी एकादशीच्या निमित्ताने बांदा येथील निमजगा अंगणवाडीतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत भक्तिमय वातावरणात दिंडी काढून वारकरी परंपरेचा संस्कार जपला. संत सोहरीबोनाथ आंबीये मंदिरातून सुरू झालेली ही दिंडी श्री विठ्ठल-रखुमाई मंदिरापर्यंत उत्साहात काढण्यात आली.
टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि “ज्ञानोबा-तुकाराम”, “पांडुरंग हरी” अशा जयघोषांनी परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. दिंडीत सहभागी झालेल्या चिमुकल्यांचे भाविक आणि ग्रामस्थांनी टाळ्यांच्या गजरात कौतुक करत त्यांना प्रोत्साहन दिले.
श्री विठ्ठल-रखुमाई मंदिर प्रशासनाच्या वतीने दिंडीचे स्वागत करण्यात आले. यावेळी चिमुकल्यांना वारकरी परंपरेचे महत्त्व आणि आषाढी एकादशीचे धार्मिक महत्त्वही सांगण्यात आले. या दिंडीचे नियोजन अंगणवाडी सेविका वर्षा आगलावे यांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या उपक्रमाचे पालक व ग्रामस्थांकडूनही विशेष कौतुक करण्यात आले.











