कणकवली (प्रतिनिधी) : गोपुरी आश्रमात ३० जानेवारी रोजी संध्याकाळी ६.०० वा. सर्वधर्म प्रार्थना सभा घेऊन राष्ट्रपित्याला अभिवादन करण्यात आले. उपस्थितांनी सत्य, अहिंसा व मानवतेच्या मार्गावर चालण्याचा संकल्प केला. यावेळी ॲड. मनोज रावराणे यांनी गांधीजींच्या देशकार्याचा सविस्तर आढावा घेतला. गांधीजी राजकारणी म्हणून मला विशेष आवडतात. महात्मा गांधी यांनी विखूरलेल्या देशाची बांधणी करून एकसंघ भारत निर्माण केला. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान लिहावे असा आग्रह धरला त्यामुळे गेली ७६ वर्षे देश एकसंघ संविधानिक मूल्यावर वाटचाल करत आहे. यापुढेही तो याच संविधानिक मूल्यावर वाटचाल करत राहणार आहे. भारत देशाची स्वतंत्र संस्कृती आहे. या संस्कृतीला मूर्त रूप देण्याचे काम गांधीजींनी केले. गांधी जर अधिक काळ जिवंत राहिले असते तर भारत देशातील जातीयता, विषमता व गरिबी नष्ट झाली असती. या देशातील समाज मानवतेच्या दृष्टीने सक्षम झाला असता.
भावी पिढीने गांधीजी वरील लिखित साहित्याचे वाचन करायला हवे. गांधीजींचे ‘सत्याचे प्रयोग’ हे आत्मचरित्र घराघरात वाचायला हवे असे मनोज रावराणे म्हणाले. यावेळी गोपुरीचे आश्रमाचे अध्यक्ष प्रा.डॉ. राजेंद्र मुंबरकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. रौनक पटेल यांनीही मनोगत व्यक्त केले. संचालिका अर्पिता मुंबरकर यांनी सर्वधर्म प्रार्थना सांगितली. साने गुरुजींची ‘खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे.’ ही प्रार्थना एकत्रित म्हणण्यात आली. यावेळी गोपुरी आश्रमाचे उपाध्यक्ष विजय सावंत, सचिव विनायक उर्फ बाळू मेस्त्री, खजिनदार अमोल भोगले, कणकवली तालुका राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष प्रदिप मांजरेकर, संकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष मुराद अली शेख, नासिर शेख, उषादेवी भालचंद्र मेस्त्री, ऋषिकेश कोरडे, संदीप सावंत, सुरेश रासम, विनायक सापळे, प्रदीप जाधव, भालचंद्र दळवी, सादिक कुडाळकर, नितीन जावळे, गुरु तेंडुलकर, गोपुरी आश्रमाचे कार्यकर्ते बाळकृष्ण सावंत, सदाशिव राणे, दाजी फाटक, कल्पेश मुळये आदी मान्यवरांसहित कणकवली परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.













