केअर संस्थेने समाजाला चांगले कार्यकर्ते दिले.- शरद सावंत,अध्यक्ष केअर
खारेपाटण : (प्रतिनिधी) समाजकार्यातील मुलभूत प्रशिक्षणाचे ध्येय समोर ठेवून केअर संस्थेने २५ वर्षांत मोठी वाटचाल केली.हजारो चांगले सक्रीय कार्यकर्ते घडविले. छोट्याशा रोपट्यातून वृक्ष झालेल्या केअर संस्थेला यापुढे कसे वाढविता येईल याचा केअरच्या विद्यार्थ्यांनी पुढे येवून विचार करावा. केअर आणि वुई केअर ( माजी विद्यार्थी संघटना ) च्या माध्यमातून समाजाला यापुढेही चांगले कार्यकर्ते देवू शकतो.असे भावपूर्ण उदगार केअरचे संस्थेचे अध्यक्ष श्री शरद सावंत यांनी केअर संस्थेला २५ वर्षे पुर्ण झाल्याच्या निमित्ताने दादरच्या मामा काणे हाँलमधे आयोजित करण्यात आलेल्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमात मार्गदर्शन करताना काढले.
केअरच्या पहिल्या बॅचचे विद्यार्थी ख्रिस्तोपर राँड्रिग्ज व बलभीम कुलकर्णी हे कार्यक्रमातील प्रमुख पाहुणे होते.यावेळी बोलताना ख्रिस्तोपर राँड्रिग्ज यांनी केअरच्या प्रशिक्षणाने हिमंत वाढविण्याचे काम केल्याचे म्हटले.तर बलभिम कुलकर्णी यांनी समाजातील वंचितांना एकत्र आणून कार्य करण्याची गरज असल्याचे म्हटले.
केअरचे संस्थापक श्रीनिवास सावंत यांनी मनोगत मांडले विश्वस्त रामचंद्र अडसुळे यांनी संस्थेच्या रौप्य महोत्सवी वाटचाली विषयी सादरीकरण केले.
केअरच्या प्रशिक्षणानंतर वामन कांबळे यांनी साद फौंडेशन सुरू करून सद्या ते महाराष्ट्रभर काम करीत आहेत.तर किशोर माने यांनी स्वतः निराधारांसाठी संस्था उभारणी करून ते कार्यरत आहेत.असे उल्लेखनीय कार्य करणारे केअरचे विद्यार्थी , कोर्स समन्वयक व प्रशिक्षक यांना यावेळी सन्मानीत करण्यात आले. यावेळी कल्याणहून आलेले एक जेष्ठ नागरिक असलेले विद्यार्थी प्रितम जाधव यांनी आयुष्याशी अजुन माझा करार बाकी आहे ही उत्स्फुर्त कविता सादर केली.
कार्यक्रमप्रसंगी माजी विद्यार्थीनी संध्या पानसकर यांनी सादर केलेल्या संघर्ष यात्री सावित्री या एकपात्री प्रयोगाने उपस्थीतांची वाहवा मिळविली. विद्युल्लता, मानसी व कुमारी यांनी विशेष बालकांच्या प्रश्नावरील छोटेखानी नाटिका सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डाँ.राजेश कापसे, विश्वस्त संदिप परब व डाँ.दिनु मँथ्यू यांनी केले.













