प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या “नंदवाळ” गावी आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी
कोल्हापूर (प्रतिनिधी) : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी आज देशभरातून लाखो भाविक हजेरी लावतात. टाळ, मृदंग आणि विठू माऊलीच्या गजरात उभी पंढरी न्हाऊन निघते. अशाच पद्धतीने कोल्हापूर जिल्ह्यातील प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या “नंदवाळ” या गावी देखील आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शिवाय पुईखडी येथे वाखरीप्रमाणे गोल रिंगण सोहळा पार पडला. सकाळपासून लाखोंच्या संख्येने भाविक नंदवाळ येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल झाले होते. नंदवाळ” येथे आषाढी एकादशीनिमित्त मोठी यात्रा भरते. कोल्हापूर येथून प्रतिवर्षी ज्ञानेश्वर माऊलींची पालखी जात असते. या दिंडीत शंभरहून अधिक गावातील दिंड्या सहभागी होतात. गेल्या अनेक वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे. आज सकाळी मिरजकर तिकटी विठ्ठल मंदिरातून शिवाजी पेठ मार्गे ही दिंडी सानेगुरुजी, वाशी नाका मार्गे प्रतिपंढरपूर नंदवाळकडे रवाना झाली. यावेळी पहिला उभा रिंगण सोहळा खंडोबा तालिम येथे तर पुईखडी याठिकाणी असलेल्या मैदानात गोल रिंगण सोहळा मोठ्या उत्साहात झाला.
सोहळ्यात आळंदी येथील ज्ञानेश्वर माऊलींच्या रथाप्रमाणे येथे देखील लाकडी रथ तयार करण्यात आला होता. तसंच ज्ञानेश्वर महाराजांची चांदीची पालखी देखील आणण्यात आली होती. यावेळी खासदार शाहू महाराज छत्रपती, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार ऋतुराज पाटील, राजेश पाटील यांच्याहस्ते पूजा करण्यात आली. हा सोहळा पाहण्यासाठी कोल्हापूरसह जिल्ह्यातील हजारो भाविक भर पावसात उपस्थित होते. यावेळी सर्वत्र विठू माऊलीचा जयघोष आणि टाळ मृदंगाचा गजर ऐकू येत होता. भर पावसात छत्र्यांसोबत भगवी पताका देखील प्रत्येकाच्या हातात दिसत होती. लहान असो किंवा ज्येष्ठ प्रत्येक प्रत्येकजण भर पावसात विठू माऊलीच्या भक्तीमध्ये भिजून गेला होता. रिंगण सोहळा पार पडल्यानंतर रिंगण पालखी पुढे मार्गस्थ होऊन “नंदवाळ” या गावी असलेल्या विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात दर्शनासाठी रवाना झाली. नंदवाळ येथे पालखी भक्तांच्या दर्शनासाठी काही काळ ठेवण्यात आली.
नंदवाळ” या गावचा प्राचीन उल्लेख नंदिग्राम असा आहे. या ठिकाणी विठ्ठल मंदिर आणि शंकराचे पवित्र स्थान भिमाशंकर ही दोन्ही पवित्र धार्मिक स्थळे आहेत. अशा प्राचीन देवतेच्या उपासनेसाठी याठिकाणी हेमाडपंती दगडी मंदिर आहे. या मंदिरांमध्ये विठ्ठल रोज रात्री वस्तव्यास होते, अशी आख्यायिका सांगितली जाते. शिवाय करवीर माहात्म्य या ग्रंथात असा उल्लेखही मिळतो. त्यामुळं या ठिकाणास प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जाते. पंढरपूरप्रमाणेच “नंदवाळ” येथे विठ्ठलाच्या संबंधित सर्व सण-उत्सव साजरे होतात. येथेही रिंगण सोहळा, दिंडी सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा केला जातो. आषाढी एकादशीला या विठ्ठल मंदिरात लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. अगदी पंढरपूर प्रमाणेच येथे मोठी यात्रा भरते. नामदेव महाराजांनी तर आपल्या आरतीमध्ये ‘युगे अठ्ठावीस विटेवरी उभा’ असा उल्लेख केला आहे.













