पालकमंत्री नितेश राणेंच्या आदेशानंतरही प्रशासनाची ३ महिने दिरंगाई

घर नावावर होण्यासाठी आत्मदहन करण्याचा ८२ वर्षीय वृद्धेचा इशारा

ओरोस (प्रतिनिधी) : २६ जानेवारी २०२५ रोजी पालकमंत्री नितेश राणे यांनी आपण केलेल्या उपोषणाला भेट देवून माझे घर माझ्या नावे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. मात्र, त्याला तीन महिने उलटले तरी घर आपल्या नावावर झालेले नाही. पालकमंत्री राणे यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविली आहे. त्यामुळे आत्मदहन करण्यासाठी आपण उपोषणाला बसले असल्याचे आरोंदा रेडकरवाडी येथील ८२ वर्षीय वयोवृद्ध महिला सरस्वती मधुकर निवजेकर यांनी सांगितले.

श्रीमती निवजेकर यांनी जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनात माझे घर माझ्या मुलानी आपल्या नावावर केलेले असून त्या घराला कुलूप ठोकले आणि मला घराबाहेर काढले आहे. माझ्या नवऱ्याची मिळकतीतून हे घर बांधलेले असून माझी फसवणूक केलेली आहे. माझे वय आज ८२ वर्षे असून माझ्या जीवीतास धोका पोचला तर त्याची जबाबदारी प्रशासन आणि माझा मुलगा मंगेश यांच्यावर असेल. माझ्या नवऱ्याची जमिन विकुन या घराचे बांधकाम मंगेश याने केलेले आहे. माझी फसवणूक करून ते घर आपल्या नावावर केलेले आहे. या प्रकरणात ग्रामपंचायत यानी कोणताही विचार न करता हे घर मंगेश यांच्या नावावर केले. अ. ब. करणार असे प्रोसिंडीग वर नोंद असताना त्यानी आमची दिशाभूल केली आहे. त्यामुळे हे घर माझे आहे. आणि माझ्या नावावर झाले पाहीजे, यासाठी आपण २६ जानेवारी २०२५ रोजी उपोषणाला बसले होते. परंतु पालकमंत्री नितेश राणे यांनी आपण केलेल्या उपोषणाला भेट देवून माझे घर माझ्या नावे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. त्यामुळे आपण उपोषण मागे घेतले होते. परंतु अद्याप प्रशासनाने ही प्रक्रिया राबविलेली नाही. गेले तीन-चार महिने आपण घराच्या बाहेर आहे. आपण ८२ वर्षाची असताना माझे स्वतःचे घर प्रशासन मला देत नाही. मग माझा जगून काय उपयोग आहे ? असा प्रश्न करीत निवजेकर यांनी आपण आत्मदहन आंदोलन करीत असल्याचे सांगितले.

error: Content is protected !!