खा. राणेंबद्दलचे गोगावलेंचे वक्तव्य गैरसमज निर्माण करणारे
सिंधुदुर्गात महायुतीत मिठाचा खडा टाकू नये – समीर नलावडे
कणकवली (प्रतिनिधी) : महायुती सरकारमधील शिवसेनेचे मंत्री भरतशेठ गोगावले यांनी कुडाळ मधील शिवसेना बैठकीत खासदार नारायण राणेंबद्दल केलेले ” ते ” वक्तव्य अत्यंत चुकीचे असून माजी मुख्यमंत्री खा. राणेंबद्दल गैरसमज निर्माण करणारे आहे. त्यामुळे मंत्री गोगावले याना त्यांच्या पक्षश्रेष्ठींनी समज द्यावी अशी मागणी कणकवली चे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केली आहे. सिंधुदुर्ग शिवसेना जिल्हा कार्यकारिणी च्या बैठकीत रोजगार हमी योजना मंत्री भरतशेठ गोगावले यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणेंबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. नारायण राणे यांनी स्वकर्तृत्वाने आपले राजकीय वलय आणि स्थान निर्माण केले आहे. त्यामुळेच राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रीयमंत्री आणि विद्यमान खासदार ह्या संविधानिक पदांवर त्यांनी आपली छाप उमटवली आहे. त्यामुळे खासदार राणेंबद्दल बोलताना गोगावले यांनी जे चुकीचे वक्तव्य केले आहे. त्यामुळे जनतेच्या मनात नाहक गैरसमज निर्माण होऊ शकतात. गोगावले यांच्या त्या वक्तव्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीत मिठाचा खडा पडू शकतो. त्यामुळे मंत्री भरतशेठ गोगावले यांना त्यांच्या पक्षश्रेष्ठींनी समज द्यावी, अशी मागणी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केली आहे.












