प्रत्येक कुटुंबाची गोष्ट सांगणारा ‘कुर्ला टू वेंगुर्ला’ चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल

निर्माते चारुदत्त सोमण यांनी व्यक्त केला विश्वास

कणकवली (प्रतिनिधी) : गावातील तरुणांच्या न होणाऱ्या लग्नाचा संवेदनशील विषय रंजकपणे हाताळून हलक्याफुलक्या पद्धतीने माडंण्यात आला असून स्पंदनने लोकसहभागातून माती आणि नाती जोडणारा, प्रत्येक कुटुंबाची गोष्ट सांगणारा ‘कुर्ला टू वेंगुर्ला’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. उत्तमोत्तम कलाकार असलेल्या या चित्रपटात मालवणी बोलीचाही तडका आहे. त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस निश्चितपणे उतरेल असा विश्वास
निर्माते चारुदत्त सोमण यांनी व्यक्त केला. कणकवली येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत श्री. सोमण बोलत होते. यावेळी अभिनेते वैभव मांगले, अभिनेत्री वीणा जामकर, विजय गावकर उपस्थित होते.

स्पंदन परिवार सिनेमा मुव्हमेंट चळवळ गेली २५ वर्ष युवकांना चित्रपटसृष्टीचे शास्त्रोक्त ज्ञान देत आहे. स्पंदनने लोकसहभागातून माती आणि नाती जोडणारा, प्रत्येक कुटुंबाची गोष्ट सांगणारा ‘कुर्ला टू वेंगुर्ला’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. राज्यभरात ग्रामीण भागात मुलांची लग्न जमणे ही समस्या झाली आहे. गावातल्या मुलींना शहराचे आकर्षण असते, त्यांच्याही आयुष्याबद्दल काही इच्छा-आकांशा असतात. परिणामी शहर आणि ग्रामीण भाग अशी दरी निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील मुलांच्या रखडणाऱ्या लग्नाचा संवेदनशील विषय, त्याच्याशी जोडलेले सामाजिक मुद्दे, परस्पर नातेसंबंध अशा विषयांची मांडणी कुर्ला ते वेंगुर्ला या चित्रपटात करण्यात आली आहे. गंभीर विषयाची अत्यंत मनोरंजक पद्धतीने हाताळणी या चित्रपटात करण्यात आली आहे. त्यामुळे सहकुटंब चित्रपटगृहात अनुभवावा, असा हा चित्रपट आहे, असे सोमण यांनी सांगितले.

सिने कथा, चंद्रभागा स्टुडिओज आणि एम. व्ही. शरदचंद्र यांनी कुर्ला टू वेंगुर्ला या चित्रपटाची निर्मिती केली आहे. अमरजीत आमले, विजय कलमकर, चारुदत्त सोमण, नयना सोनावणे, अविनाश सोनावणे, एम. व्ही. शरदचंद्र हे या चित्रपटाचे निर्माते आहे. चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद लेखन अमरजीत आमले यांचे तर दिग्दर्शन विजय कमलकर यंनी केले आहे. अभिनेते वैभव मांगले, प्रल्हाद कुडतरकर, सुनील तावडे, साईकित कामत, अभिनेत्री वीणा जामकर, स्वानंदी टिकेकर अशी उत्तम स्टारकास्ट या चित्रपटात आहे. याशिवाय अमेय परब, शेखर बेटकर, अनघा राणे या नवोदित कलाकारांचा अभिनयही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. रंगनाथ बाबू गोगीनेनी यांनी छायांकन, विजय कमलकर यांनी संकलन, अविनाश सोनावणे यांनी ध्वनिआरेखन, चंचल काळे, अमरजित आमले यांनी गीतलेखन, अक्षय खोत यांनी संगीत दिग्दर्शन, पार्श्वसंगीताची जबाबदारी निभावली आहे. हा चित्रपट १९ सष्टेंबरला रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होत आहे, असे सोमण यांनी सांगितले.

अभिनेते वैभव मांगले, अभिनेत्री वीणा जामकर यांनी या चित्रपटाचे कथानक कशाप्रकारे आहे, हे थोडक्यात सांगून चित्रपट करताना आलेले अनुभव शेअर केले. स्पंदन परिवार सिनेमा मुव्हमेंट ह्या चळवळीतून या चित्रपटाची निर्मिती झाली असून हा चित्रपट बनविताना स्पंदन परिवार सिनेमा मुव्हमेंटमध्ये काम करणाऱ्या व चित्रपटसृष्टीतील मंडळींनी निःस्वार्थपणे चित्रपट बनविण्यासाठी योगदान दिल्याबद्दल मांगले, जामकर यांनी त्यांचे आभार मानले. हा चित्रपट प्रेक्षकांनी चित्रपटगृहात आवूर्जन पाहावा, असे आवाहन त्यांनी केले.

error: Content is protected !!