नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
वैभववाडी (प्रतिनिधी) : आखवणे भोम नागपवाडी पुनर्वसन गावठाणात बिबट्याचा धुमाकूळ सुरूच आहे. वारंवार भरवस्तीत बिबट्याचे दर्शन घडत आहे. गावठाणातील पाळीव प्राण्यांवर हल्ला करून फस्त करीत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. नागरिकांना रात्रीच्यावेळी घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे. वन विभागाने या बिबट्याच्या बंदोबस्त करावा. अन्यथा जीवितहानी झाल्यास वन विभागाला जबाबदार धरण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांकडून देण्यात आला आहे.
पुनर्वसन गावठाणात अगदी भरवस्ततीत कोणत्याही वेळेस बिबट्या आपल्या भक्षाच्या शोधता फिरत आहे. याआगोदर गावठाणातील शेळ्या, कोंबड्या, पाळीव कुत्रे यांच्यावर हल्ला केला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पुनर्वसन गावठाणातील माजी सरपंच आकाराम नागप यांच्या अंगणात आठ दिवसापूर्वी बिबट्याने प्रवेश करीत अंगणात असलेल्या कुत्र्याला हल्ला करून घेऊन जात होता. मात्र या दरम्यान कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज आल्यामुळे नागप यांचे चिरंजीव पोलीस पाटील यशवंत नागप हे जागे झाले. ते घराचा दरवाजा उघडून बाहेर आले. त्यांच्या बाहेर येण्याची बिबट्याला चाहूल लागताच तोंडात पकडलेल्या कुत्र्याला सोडून तिथून त्याने पळ काढला होता. ही घटना त्यांच्या घराच्या सीसीटीव्हित कैद झाली आहे. तर पुन्हा गुरुवारी पहाटे 4.20 वाजता पुन्हा बिबट्या त्यांच्या आंगणात आल्याचे सिसिटीव्हीत कैद झाला आहे. तर त्यांच्या बाजूच्या घरातील सिसिटीव्हीत सुद्धा रात्रीच्यावेळेस घराच्या परिसरात बिबट्या फिरतानाचा अनेकवेळा कैद झाला आहे.
बिबट्याच्या वाढत्या मुक्त संचारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पुनर्वसन गावठाणात बऱ्यापैकी स्ट्रीट लाईट असल्यामुळे सगळीकडे प्रकाश आहे. असे असतानाही या प्रकाशातही भरवस्तीत बिबट्याच्या मुक्त संचार होत आहे. वन विभागाने याचा बंदोबस्त करावा. अन्यथा जीवित हानी झाल्यास वन विभागाला जबाबदार धरण्यात येईल, असा इशारा माजी सरपंच आकाराम नागप, डॉ. जगन्नाथ जामदार यांनी दिला आहे.












