कणकवलीत शिष्यवृत्ती सराव परीक्षेतील गुणवंतांचा सन्मान

४५ वर्षांची शैक्षणिक परंपरा; स्पर्धा परीक्षेची पहिली पायरी – सुरेश कामत

कणकवली (प्रतिनिधी) : प. पू. भालचंद्र महाराज संस्थान हे धार्मिक क्षेत्रासह आरोग्य व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे संस्थान म्हणून परिचित आहे. संस्थानाच्या शैक्षणिक मंडळातर्फे गेली तब्बल ४५ वर्षे शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्ग व सराव परीक्षा सातत्याने घेतली जात असून, या परीक्षेत सहभागी झालेले विद्यार्थी शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेतही अव्वल क्रमांक पटकावत आहेत. ही बाब संस्थानासाठी अभिमानास्पद असल्याचे संस्थानाचे अध्यक्ष सुरेश कामत यांनी सांगितले.

संस्थानाच्या सभागृहात आयोजित शिष्यवृत्ती सराव परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी संस्थानाचे सचिव निवृत्ती धडाम, विश्वस्त मुरलीधर नाईक, प्रसाद अंधारी, नागेश मुसळे, एस. एस. हायस्कूलचे मुख्याध्यापक जी. एन. बोडके, डी. एड. कॉलेजचे प्राचार्य श्याम सोनुर्लेकर, रामगड हायस्कूलचे मुख्याध्यापक अकुंश वळंजू, व्यवस्थापक विजय केळुसकर, शैक्षणिक मंडळाचे अध्यक्ष गजानन उपरकर, उपाध्यक्ष प्रकाश परब, प्रा. दिवाकर मुरकर, सदानंद गावकर, मंगेश तेली, शरद हिंदळेकर, सावंतवाडी केंद्राचे रावजी परब आदी मान्यवर उपस्थित होते.

कामत पुढे म्हणाले, “सध्याचे युग स्पर्धेचे आहे. या युगात टिकून राहण्यासाठी विद्यार्थ्यांना सर्वांगीण ज्ञान मिळणे आवश्यक आहे. शिष्यवृत्ती परीक्षा ही स्पर्धा परीक्षेची पहिली पायरी आहे. सातत्यपूर्ण अभ्यास आणि योग्य मार्गदर्शनामुळे कोणतीही स्पर्धा परीक्षा कठीण राहत नाही.” संस्थानाचा हा उपक्रम पूर्णपणे निस्वार्थी असून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी राबविला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

प्रा. दिवाकर मुरकर यांनी संगणकीय ज्ञानाचे महत्त्व अधोरेखित करत, डिजिटल शिक्षण आत्मसात करण्यासाठी विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाशी सुसंगत राहणे गरजेचे असल्याचे सांगितले. जी. एन. बोडके यांनी संस्थानाची शिष्यवृत्ती सराव परीक्षा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत असून भविष्यात हेच विद्यार्थी विविध उच्च पदांवर कार्यरत दिसतील, असा विश्वास व्यक्त केला.

श्याम सोनुर्लेकर यांनी कणकवलीचा ‘स्पर्धा परीक्षा पॅटर्न’ राज्यभर ओळखला जावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. पालकांच्यावतीने श्रेयश तायशेटे, तेजस बांदिवडेकर तसेच विद्यार्थ्यांमधून कर्तव्य बांदिवडेकर व आर्ची भोगले यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी जी. एन. बोडके, श्याम सोनुर्लेकर व प्रतिभा कोतवाल यांचा सत्कार करण्यात आला. इयत्ता चौथी व आठवीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. सूत्रसंचालन किरण कोरगावकर यांनी तर आभार प्रदर्शन मंगेश मेस्त्री यांनी केले. कार्यक्रमास पालक, शिक्षक, विद्यार्थी व शैक्षणिक मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!